सध्या भारत अन्य देशांवरच अवलंबून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये विविध मसाल्यांची शेती खूप दिवसांपासून केली जाते. ब्रिटीशांनी तर भारतीय मसाल्याचा आधार घेत व्यापार केला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये हिंग या पदार्थाचा वापर भारतामध्ये प्राचीन काळापासून केला जात आहे. मात्र याचे उत्पादन मात्र भारतात घेतले जात नसून त्याची आयात केली जाते. कौन्सिल ऑफ सायंटीफिक ऍण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर)ने भारतामध्ये हिंगाच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात शुक्रवारी सीएसआयआर कार्यक्रमांतर्गत यावर चर्चा केली आहे.
पंतप्रधानांनी शुक्रवारी सीएसआयआर कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे, की भारत नेहमी जगातील दुसऱया देशांवर अवलंबून राहिला आहे. परंतु सीएसआरच्या मदतीने हिंगाचे उत्पादन सुरु करण्यासाठी प्रारंभ करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यातून आयात होणाऱया हिंगावर विदेशी चलनाची बचत होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही नमूद केले आहे.
वर्षाला 1500 टन आयात
उपलब्ध माहितीनुसार भारतामध्ये प्रतीवर्षाला जवळपास 940 कोटी रुपयांच्या हिंगाची आयात केली जाते. भारतात वर्षाला जवळपास 1540 टन कच्च्या हिंगाची आयात केली जाते. अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांमधून मुख्यत्वेकरून हिंगाची आयात केली जाते.
मागील वर्षी देशात उत्पादन
हिंग हा निसर्गातील गुणकारी पदार्थ आहे. हिमालयातील पर्वतरांगावर हे एका रोपाच्या स्वरुपात आढळून येते. अनेक औषधी गुण यामध्ये असतात. सीएसआयआरने देशामध्ये हिंगाच्या शेतीसाठी इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालया बायोरिसोर्स पालमापूर (आयएचबीटी) यांच्यासोबत मागच्या वर्षी ऑक्टोबर अगोदर प्रयत्न केले आहेत. सदरच्या कार्यक्रमांतर्गत देशातील हिमालयाच्या क्षेत्रात हिंगाची शेती सुरु केली आहे.