खर्ची घातलेला निधी गेला वाया : संबंधित विभागाने दखल घेऊन पथदीप सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजकावर पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र सदर पथदीप बंदच असल्याने शोभेचे खांब बनले आहेत. पथदीप उभारण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असून पथदीपांचे बिल भरण्याचा तिढा संपुष्टात आला नसल्याने पथदीप बंद पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने गोकुळनगर ते विठ्ठल-रखुमाई मंदिरपर्यंतच्या हिंडलगा जेलसमोरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. हा रस्ता वर्दळीचा असल्याने तसेच कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुभाजक निर्माण करून अत्याधुनिक पद्धतीचे पथदीप बसविण्यात आले. सदर पथदीप प्रारंभी एक वर्षभर सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी ग्राम पंचायतीकडे हस्तांतर करण्यासाठी पंचायतला पत्र लिहिण्यात आले. पण पथदीपांच्या देखभालीसह बिलाची रक्कम कोण भरणार? असा मुद्दा उपस्थित झाला.
त्यामुळे पथदीपांच्या देखभालीची प्रक्रिया रखडली होती. परिणामी येथील पथदीप दोन वर्षे बंदच होते. महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पथदीपांच्या विद्युत बिलाची रक्कम भरणा करून सदर पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी ग्रा. पं. कडे सोपविण्यात आली होती. महालक्ष्मी यात्रेदरम्यान हे पथदीप सुरू करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण रस्ता झळकला होता. मात्र काही महिन्यांनंतर हे पथदीप बंद पडले असून सध्या याची देखभाल केली जात नाही. रात्रीच्यावेळी या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बिल भरणे ग्रा. पं.ला परवडेनासे
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. तर पथदीपांची देखभाल ग्रा. पं. कडून करण्यात येते. बिलाची रक्कम भरणे ग्रामपंचायतला परवडत नसल्याने सध्या हे पथदीप बंदच असून नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. पथदीप बंद ठेवल्याने पथदीपांचे खांब शोभेचे बनले आहेत. तसेच पथदीप उभारणीसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असल्याची टीका नागरिक करीत आहेत. हे पथदीप सुरू करणार की बंदच राहणार? अशी विचारणा नागरिकांकडून येत आहे.