जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन दिले निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बांगला देशमधील हिंदूंवर हल्ले होत आहेत, अत्याचार होत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू भयभीत झाले आहेत. त्यांना संरक्षण देणे हे कर्तव्य आहे. त्या हल्ल्यांचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदल यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.
याचबरोबर बेळगाव तालुक्मयातील रणकुंडये येथील हिंदू मंदिराची नासधूस करण्यात आली आहे. त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. हिंदू हे मानवता कल्याणासाठी आजपर्यंत कार्य करत आले आहेत. असे असताना अफगाणिस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदुंवर वारंवार हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबवावेत अन्यथा हिंदू देखील आपल्या संरक्षणासाठी कठोर पाऊल उचलतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
केंद्र सरकारने परदेशातील संकटात सापडलेल्या हिंदू समाजाला सुरक्षा द्यावी. त्यासाठी प्रथम पाऊल उचलावे. बांगलादेशवर दबाव आणावा. बांगलादेश सरकारने इस्लामिक कट्टरपंथियांवर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली. जम्मू काश्मिरमध्येही 24 ऑक्टोबरपर्यंत 11 हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. त्यामध्ये काश्मिरी पंडितांचा समावेश आहे. तेंव्हा भारत सरकारने गांभीर्याने घ्यावे आणि अल्पसंख्यांक हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. कित्तूर चन्नम्मा येथून मोर्चा काढला. मोर्चात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, कारंजीमठाचे स्वामी गुरुसिद्धेश्वर स्वामी, गंगाधर महास्वामी, कृष्णाजी भट्ट व कार्यकर्ते उपस्थित होते.