सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान – धर्मांतर करून करत आहेत चूक
केवळ विवाह करण्यासाठी धर्मांतर करणारे लोक मोठी चूक करत आहेत. हा प्रकार केवळ क्षुल्लक वैयक्तिक स्वार्थापोटी घडत आहेत. हिंदू कुटुंबांकडून स्वतःच्या मुलांना स्वतःचा धर्म आणि परंपरांचा अभिमान बाळगणे शिकविले जात नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. उत्तराखंडच्या हल्दानीमध्ये संघ स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भागवत यांनी संबोधित केले आहे. ‘हिंदू जागा झाला तर जग जागे होईल’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
धर्मांतर कसे घडते? आमच्या देशातील युवक, युवती अन्य धर्मांमध्ये कसे जातात? छोटय़ा-छोटय़ा स्वार्थांपोटी हे घडते, विवाह करण्यासाठी हे घडते. धर्मांतर घडवून आणणारे चुकीचे आहेत आहेत हे खरे असले तरीही आम्ही आमच्या मुलांना याविरोधात का तयार करत नाही असे प्रश्नार्थक विधान भागवत यांनी केले आहे.
धर्माबद्दल गौरवाचा संस्कार
आम्हाला याचे संस्कार घरातच द्यावे लागणार आहेत. स्वतःबद्दल अभिमान, स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान, स्वतःच्या पूजेबद्दल आदर, त्यासंबंधी कुणी प्रश्न उपस्थित केल्यास उत्तर देणे शिकवावे लाण्गार असल्याचे भागवत म्हणाले. अनेक भाजपशासित राज्यांनी कथित लव्हजिहाद विरोधात कायदा लागू केला असताना भागवत यांचे विधान समोर आले आहे. या कायद्यांना संघाच्या दबावातून लागू करण्यात आल्याचे मानले जाते.
महिलांचा सहभाग वाढावा
या कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी भारतीय कौटुंबिक मूल्ये आणि त्यांना कशाप्रकारे टिकवून ठेवावे याबद्दल विस्तृत भूमिका मांडली आहे. संघाचा उद्देश हिंदू समाजाला एकजूट करणे आहे, पण आम्ही जेव्हा कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा आम्हाला केवळ पुरुषच दिसून येतात. पूर्ण समाजाला संघटित करायचे असल्यास या कार्यक्रमांमध्ये किमान 50 टक्के महिलांना सामील व्हावे लागणार आहे. भारतीयांनी नेहमीच स्वतःची संपत्ती इतरांसोबत विभागली आहे. मुगलांच्या आक्रमणापूर्वी भारत अत्यंत श्रीमंत होता असे भागवत म्हणाले.
..तर भारत विश्वगुरु
जर आम्ही आमच्या समाजशैलीत बदल केल्यास तर भारत विश्वगुरु होऊ शकतो. याकरता आम्हाला आमची भाषा, भूषा, भवन, भ्रमण, भजन आणि भोजन स्वतःच्या परंपरेनुसारच करावे लागेल. भारताच्या परंपरांचे अनुकरण पूर्ण विश्व करतोय. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी एकदा स्वतःच्या आईवडिलांची सेवा कशी करावी यासंबंधीच्या परंपरांबद्दल आम्हाला भारताकडून शिकण्याची गरज असल्याचे म्हटले होते. वैदिक काळापासून महाभारतापर्यंत आमचे ग्रंथ धर्माचे पालन कसे करावे हे सांगतात असे भागवत म्हणाले.
विदेशासोबत तीर्थक्षेत्रीही जा
समाजात आम्ही गरीबांची चिंता करावी आणि जातीपातीच्या बंधनांमधून बाहेर पडावे. पॅरिस आणि सिंगापूर येथे जाण्यासह भारतातील तीर्थक्षेत्रे काशी, जालियाँवाला बाग आणि अन्य ठिकाणी देखील जावे. स्वातंत्र्यसेनानी महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगत सिंह यांची चित्रे बाळगावीत. कधीतरी पिझ्झा खाणे ठीक आहे, पण घरात आम्ही पारंपारिक पद्धतीचे भोजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.