पंतप्रधान मोदींकडून विरोधक लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये शीख आणि हिंदूंची वेचून वेचून झालेल्या हत्येप्रकरणी सोयीस्कर मौन बाळगलेले विरोधी पक्ष आणि मानवाधिकारांसाठी वेळावेळी निदर्शने करणाऱया लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्ष स्वरुपात चांगलेच सुनावले आहे. एकाच प्रकारच्या एखाद्या घटनेत काही लोकांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसते आणि तशाच प्रकारच्या दुसऱया घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचे उल्लंघन दिसत नसल्याचे म्हणत मोदींनी अशा प्रवृत्तींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या या विधानाला काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये हिंदू आणि शिखांच्या टार्गेट किलिंगशी जोडून पाहिले जातेय.
एखाद्या घटनेला जेव्ह राजकीय रंगातून, राजकीय चष्म्यातून पाहिले जाते, राजकीय नफा-नुकसानाचा विचार करत पाहिले जाते, तेव्हा मानवाधिकाराचे सर्वात मोठे उल्लंघन होत असते. अशाप्रकारचे सिलेक्टिव्ह (सोयीस्कर) वर्तन लोकशाहीसाठी तितकेच धोकादायक आहे. काही लोक मानवाधिकाराच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले.
स्वतःचे हित पाहून व्याख्या
अलिकडच्या वर्षांमध्ये मानवाधिकाराची व्याख्या काही लोक स्वतःच्या पद्धतीन, स्वतःचे हित पाहून करू लागले आहेत. एकाचप्रकारच्या कुठल्याही घटनेत काही लोकांना मानवाधिकारांचे उल्लंघन दिसते आणि तशाचप्रकारच्या दुसऱया घटनेकडे मात्र हेच लोक डोळेझाक करतात. अशाप्रकारची मानसिकता देखील मानवाधिकाराला मोठे नुकसान पोहोचवित असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भारत संवेदनशील पूर्ण जग युद्धाच्या हिंसेत होरपळत असताना भारताने पूर्ण जगाला अधिकार आणि अहिंसेचा मार्ग सुचविला आहे. महात्मा गांधींकडे देशच नव्हे तर पूर्ण जग मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहते. देशाचा स्वातंत्र्य लढा आणि आमचा इतिहास मानवाधिकारांच्या मूल्यांसाठी प्रेरणेचा मोठा स्रोत आहे. मागील दशकांमध्ये जगाला गोंधळात पाडणाऱया, भटकविणऱया अनेक घटना घडल्या आहेत, पण भारत मानवाधिकारांबद्दल नेहमीच प्रतिबद्ध अन् संवेदनशील राहिला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.