थंडीच्या या दिवसांमध्ये शरीर उष्ण राखणे आणि त्याचे आरोग्य सांभाळणे, हे महत्त्वाचे उत्तरदायित्व ठरते. प्रत्येक ऋतुमध्ये माणसाला प्रकृतीस्वास्थ्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये बदल करावा लागतो. विशिष्ट ऋतुंमध्ये विशिष्ट पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केल्याने त्याचा प्रकृतीला लाभ होतो. पारंपरिक भारतीय औषध पद्धती आयुर्वेदामध्ये यासंबंधी विपुल संदर्भ आढळतात. त्यानुसार उत्तर प्रदेशातील आयुर्वेदिक संशोधन केंद्रांमध्ये विशिष्ट प्रकारचे लाडू तयार करण्यात आले आहेत. ते खाल्ल्यामुळे हिवाळय़ात माणसाच्या शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन योग्य तऱहेने राहून शरीराचा बऱयाच आजारांपासून बचाव होतो, असे दिसून आले आहे.
हे लाडू सुंठ, हळद, तीळ, अलसी आणि मेवो या पदार्थांपासून बनविण्यात आले आहेत. येत्या एक-दोन वर्षात ते भारतभर मिळू शकतील, असे या केंद्राचे म्हणणे आहे. या लाडूंचे सेवन प्रतिदिन सायंकाळी दुधाबरोबर केल्यास हिवाळय़ातील आजारांपासून सुरक्षा मिळते, असे अनेकांवर केलेल्या प्रयोगातून आढळून आले आहे. या लाडूंमध्ये गूळ आणि तुपाचे प्रमाण अधिक असल्याने ते पौष्टिक आहेत. याशिवाय या केंद्रामध्ये इतर अनेक आयुर्वेदिक पदार्थ निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर प्रयोग सुरू आहेत. वनस्पतींचे रस, काढे, पाक इत्यादींची निर्मितीही केली जात असून मानवाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात, असे प्राथमिक प्रयोगातून आढळून आले आहे. आता या सर्व पदार्थांना मान्यता मिळवून ते बाजारात उपलब्ध करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. या पदार्थांची निर्यात करणेही शक्मय होईल, असे सांगण्यात येत आहे.