प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील हुतात्मा चौकाजवळील बारा घडघडय़ाच्या विहिरीजवळ मोठय़ा प्रमाणात कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ याप्रमाणे रात्रीच्या वेळी किर्लोस्कर रोड आणि परिसरातील व्यापारी कचरा या बोळात टाकून देतात. एवढेच नव्हे तर तो कचरा पेटवून दिला जात असल्याने आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय प्रदूषणाची समस्याही ऐरणीवर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी या चौकातील एका कोल्ड्रिंक हाऊसच्या बाजूला रात्री कचऱयाला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. संभाव्य धोका टळला असला तरी ही समस्या नेहमीचीच बनली असल्याने या परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. याबाबत तेथील काही दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनी मौन बाळगले. जुजबी उत्तरे देत त्यांनी स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले.
किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली आणि कडोलकर गल्लीतील अनेक दुकानदार, हॉटेल्स आणि फेरीवालेसुद्धा बारा घडघडय़ाच्या विहिरीच्या बाजूला असलेल्या बोळात रात्रीच्यावेळी मोठय़ा प्रमाणात कचरा टाकत आहेत. तो कचरा पहाटे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकडून उचलला जातो. पण रात्रीच मद्यपी आणि समाजकंटक धूम्रपान करताना कचऱयाला आग लावून जातात. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता, असे एका स्थानिकाने सांगितले.
बारा घडघडय़ाच्या विहिरीत दूषित पाणी
हुतात्मा चौकातील बारा घडघडय़ाची विहीर ऐतिहासिक आहे. आजही या विहिरीतून 12 गल्ल्यांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा उपलब्ध असली तरी ती कितपत सक्षम आहे, याबद्दलच शंका आहे.
कारण या विहिरीच्या अगदी काही फुटावरच सार्वजनिक मुतारी आहे. काहीजण तर विहिरीच्या आवारातच लघुशंका करतात. त्यामुळे ही मुतारी हटविण्याची स्थानिकांची मागणी आहे.
फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवू
हुतात्मा चौकातील नागरिक आणि दुकानदारांनी तक्रार केली आहे. विहिरीजवळील मुतारी हटविण्याबाबत आम्ही गंभीर आहोत. त्याशिवाय कचऱयाची समस्या सोडविण्याबाबतही ठोस निर्णय घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, तेथे फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवून हा परिसर सुशोभित केला जाणार आहे.
– जयतीर्थ सौंदत्ती, नगरसेवक
आगीमुळे घरांनाही धोका
एका रात्रीत इतका कचरा साचतो, की तो सकाळपर्यंत मुख्य रस्त्यावर येतो. आधी तर केवळ कचऱयामुळे आरोग्याला धोका होईल, ही समस्या होती. आता तर आगीच्या घटनांमुळे घरांनाही धोका उद्भवत आहे. संबंधितांना याबाबत कल्पना दिली आहे.
– नीता नाकाडी, स्थानिक