रत्नागिरी/ प्रतिनिधी
कोरोनाची लस घेतली म्हणजे कोरोना आपल्यापासून दूर होणार नाही. त्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतानाच सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे. नव्या स्ट्रेनमध्ये कोरोना झाल्यानंतर 3-4 दिवसातच फुफ्फुसात संसर्ग होऊन प्रकृती गंभीर होत आहे. तरुण मुले कोरोना अंगावर काढत असल्याने त्यांची मृत्यूसंख्या वाढत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. तसेच सध्या ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’मुळे अचानक चक्कर येऊन पडण्याचे प्रकार तरुणांमध्ये अधिक वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली..
कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक आहे. यापूर्वी 14 ते 15 दिवसांच्या कालावधीनंतर रुग्ण मृत्यूमुखी पडत होता. मात्र सध्या 7-8 दिवसांतच रुग्ण गंभीर होऊन मृत्यूमुखी पडत आहे. हवेतून थेट फुफ्फुसात संसर्ग होत असल्याने धोका वाढला आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्याचा संशय आला तरी तत्काळ स्वॅब टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या दृष्टीने उपचार झाल्यानंतर रुग्ण बरा होऊन घरी जाऊ शकतो. परंतु सुरुवातीला लक्षणे दिसूनही घरगुती किंवा स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले जातात. त्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची टेस्ट केली जाते. तोपर्यंत फुफ्फुसामध्ये संसर्ग सुरु झालेला असतो, असे डॉ. फुले यांनी सांगितले.
सध्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने तरुणवर्ग सुरुवातीला आजार व लक्षणांकडे दुर्लक्ष करीत असतो. औषधांमुळे सुरुवातीला बरे झाल्यासारखे वाटते. परंतु 4-5 दिवसांनी अग्नशक्तपणा येऊन चक्कर येऊन पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. याला ‘हॅप्पी हाय फॉक्सिया’ असे म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यात प्रकृती गंभीर होऊन फुफ्फुसाला वेगाने संसर्ग होतो. ऑक्सिजनची मात्रा कमी होते. यात रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असल्याचेही डॉ. फुले यांनी सांगितले.
प्रशासनाकडून रुग्णांच्या काळजीचा सर्वतोपरी प्रयत्न
नागरिकांनी न घाबरता टेस्ट करुन घेतली पाहिजे, तरच उपचार तातडीने व योग्य पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहेच, परंतु लसीकरण हे कोरोनापासून वाचण्याचा मार्ग नाही. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे, असे डॉ. फुले यांनी सांगितले. प्रशासन, आरोग्य विभाग रुग्णांची काळजी घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही त्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.