चित्रकूट पर्वतावरील वनात असताना श्रीरामांची भेट अत्रिमुनींशी झाली. काही काळ त्यांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. तिथून पुढे जात श्रीरामांनी मध्य प्रदेश आणि आताच्या छत्तीसगढ राज्यातील दाट जंगलात आपले निवासस्थान बनवले. अत्रिमुनींच्या आश्रमापासूनच दंडकारण्य सुरू होते. तिथून निघताना अत्रिमुनी त्यांना म्हणाले, ‘हे राघवा, या वनात भयानक राक्षस आणि सर्प वास करतात. ते मनुष्यांना अतिशय त्रास देतात. त्यांच्यामुळे अनेक तपस्व्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तुम्ही त्यांचा नाश करून त्या तपस्व्यांचे रक्षण करा.’ श्रीरामांनी त्यांची आज्ञा मानून राक्षस आणि सर्पांचा नाश करण्याचे वचन देऊन सीता लक्ष्मणासह पुढे प्रस्थान केले. मंदाकिनी, गुप्त गोदावरी, छोटय़ा टेकडय़ा, गिरीकंदरे ओलांडून ते अतिशय दाट जंगलात.. दंडकारण्यात मध्य प्रदेशातील ‘सतना’ ला पोचले. तिथे काही काळ राहिल्याने त्या भागाला आता ‘रामवन’ म्हणून ओळखले जाते. त्या प्रदेशातील नर्मदा आणि महानदीच्या किनाऱयावरील वास्तव्यात त्यांनी अनेक ऋषिंच्या आश्रमांना भेट दिली. दंडकारण्य आणि सतनाच्या पुढे गेल्यावर त्यांनी विराध, शरभंग तसेच सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमांना भेट दिली. नंतर आपल्या दहा वर्षांच्या भ्रमंतीत त्यांनी अनेक ऋषिंची भेट घेऊन त्यांच्याकडून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे ज्ञान घेतले. ते जिथे जिथे गेले ती क्षेत्रे आज या तिघांच्या वेगवेगळय़ा नावांनी ओळखली जातात. उदा. रामगढ, सीताकुंड, तर दोन गुंफांची नावे ‘लक्ष्मण बोंगरा’, ‘सीता बोंगरा’ या नावांनी ओळखली जातात. दंडक नावाच्या बलाढय़ राक्षसाच्या नावावरून त्या अरण्याला दंडकारण्य नाव पडले. रामायण काळातील रावणाचा सहकारी बाणासुराचे तिथे राज्य होते. त्याने तिथे इंद्रावती नदीकाठी ‘बारसूर’नावाचे नगर वसवले. तिच्याच काठावर त्याने ‘दांत तोना देवी’ ची स्थापना केली. त्या ठिकाणाला आता ‘दंतेवाडा’ म्हणून ओळखले जाते. गोंड नावाची आदिवासी जमात तिथे आढळते. तर सद्यःस्थितीत ते क्षेत्र नक्षलवाद्यांच्या अमलाखाली आहे.
आंध्र प्रदेशातील भद्राचलम् शहर हा दंडकारण्याचाच भाग आहे. भद्राचलम् म्हणजेच तेव्हाचा भद्रगिरी. हे शहर गोदावरीच्या तटावर वसले आहे. प्रभू श्रीराम आणि सीतेचे प्रसिद्ध मंदिर भद्रगिरी पर्वतावर आहे. याच भद्रगिरीवर श्रीरामांनी काही काळ घालवला होता. याच्याच आसपासच्या परिसरात आकाशात रावण आणि जटायूचे युद्ध झाले होते आणि जटायुच्या शरीराचे काही अवयव दंडकारण्यात येऊन पडले होते. म्हणूनच येथे जगातील जटायूचे एकमेव मंदिर आढळते.