कृषीकरता सुविधांचा विकास : 8.5 कोटी शेतकऱयांना मिळणार 2,000 रुपयांचा 8 वा हप्ता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच आज ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा (कृषी पायाभूत निधी) शुभारंभ करणार आहेत. या ऍग्री इन्फ्रा फंडचे सादरीकरण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. केंद्र सरकारने कृषी पायाभूतशी संबंधित प्रकल्पांना चालना देण्यासाठी जुलैमध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या ऍग्री-इन्फ्रा फंडच्या स्थापनेस मंजुरी दिली होती.
1 लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत निधीचा वापर ग्रामीण भागात कृषी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याकरता होणार आहे. या निधीमुळे ग्रामीण क्षेत्रात शीतगृहे, साठवणूकगृहे, वेष्टनाची सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे.
ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड
कोविड-19 ला तोंड देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजचा ऍग्री इन्फ्रा फंडहिस्सा आहे. या निधी अंतर्गत 10 वर्षांच्या कालावधीपर्यंत वित्तीय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या निधीतून कृषीशी संबंधित प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. या निधीच्या स्थापनेचा उद्देश ग्रामीण क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि रोजगाराला चालना देणे आहे. या योजनेंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांकडून 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज प्राथमिक ऍग्री क्रेडिट सोसायटी, शेतकऱयांचा गट, शेती उत्पादनाच्या संघटना, कृषी उद्योजक, स्टार्टअप्सना दिले जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाईल. पुढील 3 आर्थिक वर्षात 30-30 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. या वित्तीय सुविधेंतर्गत कर्जावर 3 टक्के वार्षिक व्याजाची सवलत दिली जाणार आहे. ही सवलत कमाल 2 कोटी रुपयांच्या कर्जावर उपलब्ध होईल. व्याजावरील सवलत कमाल 7 वर्षांपर्यंत मिळणार आहे.
पीएम किसान योजना
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 8.5 कोटी शेतकऱयांना 2 हजार रुपयांचा आठवा हप्ता रविवारी जमा केला जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱयांना एका वर्षात 6 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये जमा केले जातात.