प्रतिनिधी / बेंगळूर :
कर्नाटकात भाजप सत्तेवर येण्यास कारणीभूत ठरलेल्या आमदारांना अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. काँग्रेस आणि निजदमधून भाजपमध्ये पक्षांतर करून आलेल्या आणि विधानसभा पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या 10 जणांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. मात्र, अथणीचे आमदार महेश कुमठहळ्ळी यांना मात्र अखेरच्या क्षणी डावलण्यात आले आहे. बेंगळूरनंतर बेळगाव जिल्हय़ाला अधिक मंत्रिपदे मिळाली आहेत. राज्य मंत्रिमंडळात सध्या बेळगाव जिल्हय़ातून रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील, शशिकला जोल्ले आणि लक्ष्मण सवदी या चौघांचा समावेश आहे.
गुरुवारी सकाळी राजभवनमध्ये झालेल्या समारंभात 10 नूतन मंत्र्यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पोटनिवडणुकीत निवडून आलेले महेश कुमठहळ्ळी, तसेच ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी, माजी आमदार सी. पी. योगेश्वर तसेच पोटनिवडणुकीत पराभूत झालेले एच. विश्वनाथ, एम. टी. बी. नागराज यांच्यासह अनेक जणांना मंत्रिपदाची संधी हुकली आहे. मंत्रिपदावरून पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या 11 पैकी 10 जणांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यास भाजपश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार गुरुवारी 10 आमदार कॅबिनेट मंत्रिपदी शपथबद्ध झाल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 28 वर पोहोचली आहे.
26 जुलै रोजी येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आतापर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात अद्याप 6 जागा रिक्त आहेत. तिसऱया टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा मंत्रिमंडळ पुनर्रचना करताना या रिक्त जागांवर नेमणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱया टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी हुकलेल्यांना तिसऱया टप्प्यात स्थान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. नूतन मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात भाजपमधील अनेक मंत्री आणि आमदार अनुपस्थित
होते.
मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले उमेश कत्ती, सी. पी. योगेश्वर, मंत्री के. एस. ईश्वरप्पा, बी. श्रीरामुलू यांच्यासह अनेक जण गैरहजर होते. केवळ 30 आमदार यावेळी उपस्थित होते.
प्रादेशिक असमतोल
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण असतानाच अनेक जिल्हय़ांना प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. केवळ बेंगळूर आणि बेळगाव जिल्हय़ाला अधिक प्राधान्य देण्यात आल्याने प्रादेशिक असमतोल निर्माण झाल्याचा सूर भाजप गोटातून उमटत आहे. बेंगळूर जिल्हय़ाला 7 आणि बेळगाव जिल्हय़ाला 4 मंत्रिपदे मिळाली आहेत. गुलबर्गा, म्हैसूर, रामनगर, बेंगळूर ग्रामीण, हासन, कोडगू, विजापूर, चित्रदुर्ग, रायचूर, कोप्पळ, दावणगेरे, चामराजनगर यासह अनेक जिल्हय़ांतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. येडियुराप्पा लिंगायत समाजातील असून त्यांनी याच समाजातील अधिक आमदारांना मंत्रिपदे दिली आहेत. 27 मंत्र्यांपैकी 8 जण लिंगायत समाजातील आहेत. तर वक्कलिग समाजातील 7 जणांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत.