पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा ः पार्थ चॅटर्जींवर गंभीर आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये एसएससी घोटाळा (स्कुल सर्व्हिस कमिशन) चर्चेत आहे. यापूर्वी ईडीच्या छाप्यांमध्ये 21 कोटी रुपये रोख स्वरुपात हस्तगत झाले होते आणि ममता सरकारमध्ये मंत्री असणारे पार्थ चॅटर्जी यांना अटक झाली आहे. घोटाळय़ात पार्थ यांची निकटवर्तीय तसेच अभिनेत्री अर्पिता मुखर्जीचेही नाव समोर आले. माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांचा नवा प्रताप आता समोर आला आहे. पार्थ चॅटर्जी यांच्या सुरक्षारक्षकाच्या 10 नातेवाईकांना शिक्षण विभागात नोकरी मिळाल्याचा आरोप आहे. भाऊ-भावजयीपासून जावयापर्यंत सर्वांना शासकीय शिक्षक करण्यात आले. आता याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
10 प्राथमिक शिक्षकांना मिळालेल्या नोकरीप्रकरणी चौकशी करणत यावी असे कलकत्ता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे 10 शिक्षक मंत्री पार्थ चॅटर्जी यांचा सुरक्षारक्षक विश्वभंर मंडलचे नातेवाईक असल्याचा आरोप आहे. या भरतींना पश्चिम बंगाल एसएससी भरती घोटाळय़ाशी जोडून पाहिले जात आहे.
पार्थ चॅटर्जींच्या सुरक्षारक्षकाच्या ज्या नातेवाईकांवर रुपये देऊन नोकरी मिळविल्याचा आरोप आहे, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जावे. या सर्वांकडून नोकरी कशाप्रकारे मिळाली हे जाणून घेतले जावे. यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र 17 ऑगस्टपर्यंत सादर करावे लागणार असल्याचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी आदेशात नमूद केले आहे.
सुरक्षारक्षक विश्वंभरचा भाऊ बन्सीलाल अन् देवगोपाल मंडल, पत्नी रीना मंडल, बहिणीचा नवरा अरुप भौमिक, भावजय पूर्णिमा मंडल आणि जावई सोमनाथ पंडितसह कुटुंबातील अन्य नातेवाईकांना शिक्षकाची नोकरी मिळवून देण्यात आल्याची तक्रार याचिकाकर्ते रमेश मलिक यांनी 22 जुलै रोजी केली होती. पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाने या सर्वांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.
3 ऑगस्टपर्यंत कोठडी
तृणमूलचे तेहट्टा येथील आमदार तापस साहा यांना या घोटाळय़ाप्रकरणी 17 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचा निर्देश दिला. तर पार्थ चॅटर्जी यांना 3 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये त्यांची चौकशी केली जात आहे.
12 बनावट कंपन्यांचा वापर
शिक्षणक विभागातील घोटाळय़ाप्रकरणी एका मागोमाग एक खुलासे होत आहेत. मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी 12 बनावट कंपन्या चालवत होत्या आणि याच कंपन्यांद्वारे काळा पैसा वापरात आणला जात होता. हा प्रकार मनी लॉन्ड्रिंगचा होता असे ईडीच्या अधिकाऱयाने सांगितले आहे.