ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेचे जवळपास 40 आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे आता सेनेचे 18 पैकी 10 खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याचा दावा नांदेडमधील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.
शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांचा शिंदे यांनी ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असा वेगळा गट स्थापन केला असून, राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा हेतू आहे. जसे शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाले, तसेच सेनेचे 18 पैकी 10 खासदारही बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सत्ताबदल होताच हे खासदार भाजपात दाखल होतील.
शिंदेंच्या गटात सामील झालेले सेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी असल्याचेही चिखलीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. वर्तमानपत्रात फोटो झळकण्यासाठी जे जिल्हा प्रमुख एकनिष्ठतेची आव आणत आहेत. कल्याणकर यांच्या घरावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे कल्याणकर यांना घाबरण्याची गरज नाही, कारण ते शिवसेना-भाजप युतीचे आमदार आहेत. त्यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार झाले आहेत. त्यामुळे आमदार कल्याणकर यांच्या पाठीशी आम्ही उभे असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे चिखलीकर म्हटले आहे.