ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, त्यासाठी येत्या अधिवेशनात स्वतंत्र कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांची ही फसवणूक थांबवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. त्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा केला जाईल. ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपालाकडे घेऊन जाणार आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करावे, अशी मागणी करणार आहे. त्यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील, असेही सत्तार म्हणाले.