अध्याय सत्ताविसावा
उद्धवाने केलेल्या विनंतीनुसार भगवंतानी उद्धवाला विसर्जनापर्यंतचा पूजेचा विधी सांगितला. तो ऐकून उद्धवाच्या मनात आले की, साधकांना पूज्य मूर्ती तरी कोणती म्हणून समजायची? हे उद्धवाचे मनोगत जाणून त्याविषयी भगवंत म्हणाले, उद्धवा! अमुक एक मूर्ती पूजेसाठी योग्य किंवा अमुक एक अयोग्य असे काही नसते कारण सर्वत्र माझे अस्तिव आहेच. म्हणून जी मूर्ती ज्याला आवडत असेल, त्याने तिचे पूजन करावे. कोणत्याही प्रतिमेचे पूजन केले तरी ती पूजा मलाच पोहोचते. भक्तांचे प्रेम जिच्यात अधिक असते, त्याच्या अधीन मी परमात्मा असतो. मुलाबरोबर खेळताना आई ज्याप्रमाणे त्याच्याच मनाप्रमाणे खेळते, त्याप्रमाणे भक्तप्रेमाच्या लीलेनुसार मीही क्रीडा करत असतो. मी या सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आणि अवतारादि लीलेने घेतलेल्या देहात अगदी सारखाच आहे, यात मुळीच संशय नाही. उद्धवा! मी नाही असे रिते ठिकाणच नाही पण प्राण्यांचे प्रारब्ध कसे असते पहा, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवून मला ते भजतच नाहीत. प्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर त्यांच्या गीतातून देवांचे मनोगत छान व्यक्त करतात. ते म्हणतात, देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई, देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी, देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे, तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण, काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही. ज्यांचा भगवंतांच्या सांगण्यावर विश्वास आहे ते सर्वत्र देव पाहतात. समोर असलेला प्रत्येक सजीव, निर्जीव हा त्यांच्या दृष्टीने देवाचंच रूप असतो. सहाजिकच प्रत्येकाबरोबर वागताना आपण देवाशीच व्यवहार करतोय असे समजून सहिष्णुतेने वागत असतात. असं जरी असलं तरी असे कित्येक भक्त आहेत की, जे फक्त मूर्तीतच देव आहे असे मानतात. म्हणून भगवंत म्हणतात, अशा माझ्या भक्तांसाठी उद्धवा तू केलेल्या विनंतीमुळे मी उपासनामार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने त्यांच्या आवडत्या मूर्तीची पूजा करून माझी कृपा संपादन करतात. उपासनामार्गाचे हे खरे रहस्य आहे. माझी प्रतिमामूर्ती असली तरी तीसुद्धा माझेच चिदात्मरूप आहे. उद्धवा! तिचीसुद्धा भाव धरून भक्ती केल्यास भक्ताचा उद्धार होतो. तात्पर्य, क्रियायोगाचे लक्षण वैदिक व तांत्रिक असे मिश्र आहे. त्याचा वेदशास्त्रात मोठाच विस्तार आहे परंतु त्यांतील मुख्य सार तुला मी सांगितले. या क्रियायोगाच्या भजनमार्गानं भक्त जर भोग व मोक्ष मागेल, तर त्या दोन्ही सिद्धी मी श्रीहरि त्यास तत्काल देतो. विशेष म्हणजे एखाद्या भक्ताने माझ्याकडे काहीच न मागता माझे भजनपूजन केले तर भोग-मोक्षादि संपत्ती घेऊन मी श्रीपती त्याच्या दारात सर्वकाळ तिष्ठत असतो. त्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले भोग मी आपणहून त्याला बहाल करतो. मोक्षाबद्दल सांगायचं म्हणजे उद्धवा, मोक्ष हा मरणानंतर मिळतो असा काहींचा समज आहे पण प्रत्यक्षात ही जिवंतपणी अनुभवायची स्थिती आहे. ज्या भक्ताला आहे ह्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे वाटत असते तो जिवंतपणी मोक्ष मिळवतो. त्याला हरिभजनात अत्यंत गोडी वाटत असते. त्यामुळे तेच जमेल तितके करत रहावे असे त्याला वाटत असते. मोक्षाचे हे रहस्य संत सोयराबाईनी बरोबर ओळखले होते. म्हणून त्या त्यांच्या अभंगात म्हणतात हरिभजनाविण काळ घालवू नको रे? ।।1।। दोरीच्या सापा भिवुनी भवा । भेटी नाही जिवा-शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।2।। विवेकाची ठरेल ओल । ऐसे की बोलावे बोल । आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।3।। संत संगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज । अनुभवावीण मान हालवू नको रे ।।4।। सोहिरा म्हणे ज्ञानज्योती । तेथ कैचि दिवस-राती । तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ।।5।। सोहीराबाईंचे अनुभवाचे बोल सर्वथा चिंतनीय आहेत.
क्रमश: