पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली असून, 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 283 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. परीक्षेच्या तयारीबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यंदा प्रचलित पद्धतीने परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी पहिल्यांदाच उच्चस्तरीय बैठक झाली. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आकलनासाठी दहा मिनिटे देण्याऐवजी परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे दिली जातील. सीबीएसईला वीस मिनिटे आधी दिली जातात. त्यामुळे पालक-विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे देण्यात आली. कॉपी रोखण्यासाठीच्या कृती कार्यक्रमासाठी विविध घटकांकडून 238 सूचना प्राप्त झाल्या.
अधिक वाचा : भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही
विभागीय मंडळ, जिल्हाधिकारी स्तरावर भरारी आणि बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर असेल. परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवली जातील. तसेच सहायक परीरक्षकाचे जीपीएसद्वारे ट्रकिंग केले जाईल. नव्या केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. उच्च शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप असला, तरी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. कोणाच्या प्रात्यक्षिक परीक्षा बाकी असल्यास 21 मार्चला लेखी परीक्षा संपल्यावर प्रात्यक्षिक परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे गोसावी यांनी सांगितले. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक या वेळी उपस्थित होत्या.