आग्य्रातील क्षेत्र बजाजा समितीला 136 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत या संस्थेने सातत्याने समाजसेवा करून लोकांचा आधार बनण्याचे व्रत सुरू ठेवले आहे. कर्म आणि धर्म यांच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे निराकरण हे या संस्थेचे ध्येय आहे. 125 वर्षांहून अधिक काळ या संस्थेने विविध सामाजिक प्रकल्प पूर्ण केले असून अनेक गरिबांना साहाय्य केले आहे.
136 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबरला स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रारंभिक उद्दिष्ट अत्यंत मर्यादित होते. तथापि, महत्त्वाकांक्षा मोठी होती. या संस्थेची स्थापना आग्रा शहरातील ठोक व किरकोळ कापड व्यापाऱयांनी केली होती. ही संस्था स्थापन करण्यामागचे कारणही स्वारस्यपूर्ण आहे. पूर्वीच्या काळी मृतदेहावर पांघरण्याचे कफन व इतर सामग्री आग्य्रातील जामा मशिदीच्या परिसरात असलेल्या दुकानातून आणावी लागत होती. ते एकच दुकान असल्याने मनमानी किंमत आकारली जात होती. आग्य्रातील एका कापड व्यापाऱयाच्या घरात त्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर या दुकानातून कफन आणण्यासाठी तो व्यापारी गेला होता. दुकानदाराने चौपटीहून अधिक किंमत मागितली. व्यापाऱयाने वाजवी किंमत का घेत नाही? असे विचारले असता ‘पुढच्या वेळी पुन्हा या, त्यावेळी वाजवी किंमत घेऊ’ असे उद्धट उत्तर त्याला मिळाले. त्यामुळे संतप्त झालेल्या या व्यापाऱयाने सर्वसामान्यांची होणारी अशी लूट थांबविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली. त्याला सर्व व्यापाऱयांनी प्रतिसाद दिल्याने ही संस्था स्थापन झाली.
आता या संस्थेकडून केवळ अंत्यसंस्कारांसाठी उपयुक्त सामग्री कमीत कमी दरात पुरविली तर जातेच. शिवाय संस्थेच्या विस्ताराबरोबरच इतरही अनेक सार्वजनिक कामे केली जातात. यात शिक्षणापासून आरोग्य सेवेपर्यंत साऱयांचा समावेश आहे. संस्थेचे मुख्य काम मृतदेहांवर कमीत कमी खर्चात अंत्यसंस्कार हे असले तरी आरोग्य सेवेवरही आता भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवांमध्ये आयुर्वेदिक औषधे, डायलेसिस सेवा, नेत्र चिकित्सा, लहान-मोठय़ा शस्त्रक्रिया आदी सुविधा गरिबांना कित्येकदा विनामूल्य उपलब्ध केल्या जातात. कोरोनाकाळातही संस्थेने मोठे कार्य केले असून अनेक गरीब रुग्णांना जीवनदान दिले आहे.