बांगलादेशात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मोठे पलायन
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात आजपासून 14 दिवसांचे कठोर लॉकडाउन लागू होणार आहे. हे लॉकडाउन स्थलांतरित कामगारांसाठी मोठे संकट ठरले आहे. लॉकडाउनच्या माऱयापासून वाचण्यासाठी कामगार लवकरात लवकर राजधानी ढाक्यातून बाहेर पडू पाहत आहेत. याचमुळे ते बाइक, ऑटो रिक्षा, लोडिंग ऑटो, ट्रक आणि रुग्णवाहिकांचाही वापर करत आहेत. लॉकडाउनदरम्यान हाताला काम नसते, काम नसल्याने घरभाडे कसे भरणार? पोटे कसे भरणार? याचमुळे बिऱहाडासह गावी परतत आहोत, लॉकडाउनमध्ये शहर सोडण्यासाठी आमच्याकडे कुठलाच पर्याय नसल्याचे या कामगारांनी म्हटले आहे.
बांगलादेशात सार्वजनिक वाहतूक सेवा 23 जूनपासून ठप्प आहे. अशा स्थितीत कामगारांदरम्यान ढाका सोडण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. तेथील नौकासेवा देखील 24 तास काम करत आहेत. नौकांमधून क्षमतेहून अधिक लोक प्रवास करत आहेत. एका नौकेवर हजारो लोक पोहोचत असल्याने कोरोनाचे संकट वाढण्याची भीती देखील आहे.
क्षमतेहून अधिक लोक नौकेवर जाऊ नयेत अशी आमची इच्छा आहे, पण कामगार आमचे ऐकूनच घेत नाहीत असे मुन्शीगंज बंदरावर तैनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद रेजा यांनी म्हटले आहे. रविवारी सुमारे 80 हजार कामगारांनी पलायन केले आहे. एका आठवडय़ात 5 लाखांहून अधिक कामगारांना ढाक्यातून काढता पाय घेतला असल्याची माहिती बांगलादेश आंतरदेशीय जलपरिवहन निगमच्या एका अधिकाऱयाने दिली आहे.
तर लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर लोकांनी कित्येक महिन्यांच्या धान्याची तजवीज करण्यास प्रारंभ केला आहे. अनेक शहरांमधील स्टोअर्स यामुळे रिकामी होऊ लागली आहेत. तर कामगारांचे पलायन पाहून बांगलादेशाने भारताला लागून असलेली सीमा 14 दिवसांसाठी बंद केली आहे. रोजगाराच्या शोधात कामगार भारतात गेल्यास नवे संकट उभे राहू शकते असे सरकारचे मानणे आहे.
भारतात व्हिसावर दाखल
15 दिवसांच्या व्हिसावर उपचारासाठी भारतात आलेले बांगलादेशी नागरिक नवी दिल्ली, कोलकाता आणि अगरतळामध्ये आवश्यक अनुमती घेऊनच बेनापोल, अखैरा आणि बूरीमारी सीमांमधून बांगलादेशात प्रवेश करू शकतात. त्यांच्याकरता 72 तासांमधील आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असणार आहे.
15 महिन्यांमधील उच्चांकी रुग्ण
बांगलादेशात डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोमवारी तेथे उच्चांकी 8364 रुग्ण सापडले आहेत. हा आकडा 15 महिन्यांमध्ये सर्वाधिक आहे. बांगलादेशात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. देशात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 770 रुग्ण सापडले आहेत. तर 14,276 जणांचा मृत्यू झाला आहे.