प्रतिनिधी/ काणकोण
गोव्यात मुक्तीलढय़ाचे पर्व 1946 नंतर सुरू झाले. डॉ. राम मनोहर लोहिया हे गोव्यात विश्रांतीसाठी आले असता त्यांनी गोव्याची परिस्थिती पाहिली. गोव्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. गोव्याची जनता गुलामगिरीचे व हलाखीचे जीवन जगत आहे. हा प्रकार पाहून मनात एक प्रकारची चीड निर्माण झालेल्या डॉ. लोहिया यांनी 18 जून, 1946 रोजी आजच्या मडगावच्या लोहिया मैदानावर क्रांतीची ज्योत पेटविली आणि एक प्रकारे गोमंतकीयांच्या मनातली स्वातंत्र्याची मशाल जागी केली. हे आता तुम्ही पुढे चालवायचे आहे असे सांगून लोहिया यांनी गोव्याचा निरोप घेतला. मडगावचे लोहिया मैदान हे खरे म्हणजे गोमंतकीयांचे स्फूर्तिस्थान आहे. नव्या पिढीने त्याची शान वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत आज 9 रोजी वयाच्या 85 व्या वर्षांत पदार्पण करणारे आणि सध्या मुंबईत वास्तव्य असलेले नरसिंह अनंत प्रभू यांनी व्यक्त केले.
9 ऑगस्ट, 1942 रोजी महात्मा गांधींनी चले जाव चळवळ सुरू केली. त्यावेळी आपण केवळ 6 वर्षांचे होतो. आज 9 ऑगस्टची चळवळ विस्मृतीकडे गेली आहे. हळूहळू 18 जून देखील जाईल की काय, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 450 वर्षे पोर्तुगीजांच्या जोखडाखाली राहिलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी खरी चळवळ त्यावेळीच व्हायला हवी होती. परंतु वाट दाखविणारा कोणी तरी हवा होता. ते काम डॉ. लोहियांनी केले. गोव्यातील अनेक सत्याग्रहींनी त्यांना साथ दिली. गोव्यात खरा लढा 1954-55 नंतर सुरू झाला. त्यावेळी माजाळी-आंगडी या ठिकाणी नॅशनल काँग्रेस-गोवाचे कार्यालय होते. स्व. मनोहर प्रभुदेसाई, पीटर आल्वारीस, सिंधुताई देशपांडे यासारखी मंडळी त्या ठिकाणी येत असत. पत्रके आणणे आणि ती योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे काम मनोहर प्रभुदेसाई करायचे. 26 जानेवारी, 1955 रोजी स्व. नारायण प्रभू यानी लोलयेला सत्याग्रह केला. त्या प्रेरणेतून आपणही गोव्यासाठी काही तरी करायला हवे अशी इच्छा मनात धरली आणि 18 जून, 1955 रोजी केशव दा. प्रभुदेसाई, देविदास श्रीधर पै, माधव जी. प्रभुदेसाई, रामदास प्रभू यांच्यासमवेत आपण पणजीत सत्याग्रह केला, असे प्रभू यांनी सांगितले. त्यावेळी त्यांना अटक झाली. नंतर सुटका झाली असली, तरी गोव्यासाठी थोडीशी सेवा करण्याची संधी मिळाली यातच त्यांना समाधान आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना मान-सन्मान दिला जात नसल्याची खंत
1954-55 साली सुरू झालेला लढा 19 डिसेंबर, 1961 पर्यंत चालू होता. त्या लढय़ात अनेकांनी समिधा दिल्या. कित्येकांनी हौतात्म्य पत्करले, तुरुंगवास भोगला. पोर्तुगीजांचा अमानुष मार खाल्ला, हालअपेष्टा सोसल्या. काही जणांना वाटते की, गोवा सहज मुक्त झाला. येथील सत्याग्रहींची तळमळ, सत्याग्रह पाहून पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना सैन्य पाठवावे लागले. कृष्ण मेनन कृष्णासारखे धावून आले. तत्कालीन गृहमंत्र्यांनी सहकार्य केले. या गोष्टी तितक्याच खऱया आहेत, असे प्रभू म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांची संख्या हळूहळू घटत आहे. त्यांना हवा तो मान-सन्मान दिला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती भवनातील सत्कार अविस्मरणीय
पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाजवळ जे स्मारक उभारण्यात आलेले आहे ते काणकोणच्या स्वातंत्र्य संग्रामाचे स्मारक आहे. ते स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक नाही, असे प्रभू म्हणाले. दोन वर्षांपूर्वी देशाच्या राष्ट्रपतीनी आपला तसेच रामदास प्रभू यांचा राष्ट्रपती भवनात केलेला सत्कार हा अविस्मरणीय असा सोहळा होता. त्या सोहळय़ाने आपण भारावून गेलो, असे कृतज्ञतेने त्यांनी सांगितले. नोकरीनिमित्त मुंबईला वास्तव्य जरी राहिले, तरी माशे येथील श्री निराकार देवालयाचा जत्रोत्सव, महालवाडा-पैंगीण येथील श्री नरसिंह परशुराम देवाचा वार्षिक उत्सव, पैंगीणची तिसालाची गडय़ांची जत्रा या उत्सवांना आवर्जुन उपस्थिती लावणाऱया नरसिंह प्रभू यांना आता वय वाढल्यामुळे प्रवास करणे जमत नाही. मात्र त्यांची स्मृती दांडगी आहे आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ाविषयी तासन्तास बोलण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. 9 ऑगस्ट आणि 18 जून हे दिवस विसरता कामा नयेत आणि मडगावच्या लोहिया मैदानाकडे स्फूर्तिस्थान म्हणून पाहायला हवे, असे त्यांना वाटते.