या मुद्द्यावर राजकारण न करण्याचे भाजपचे आवाहन, सर्वांना निमंत्रण, राजदंडाचे हस्तांतरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या नव्या आणि भव्य भवनाचे उद्घाटन राजकीय वादात सापडले आहे. 28 मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. तथापि, 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. सत्ताधारी पक्षाने संसदेतून लोकशाहीचा आत्माच नाहीसा केला आहे. अशा स्थितीत आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असा आरोप त्यांनी केला.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणे उचित ठरले असते. ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणे योग्य नाही, असा आक्षेप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतला होता. तथापि, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आणि उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
‘श्रमयोग्यां’चा होणार सत्कार
नव्या संसद भवनाचे निर्मिती कार्य 60 हजार श्रमयोग्यांनी विक्रमी द्रुतगतीने केले आहे. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमात त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचे योगदान या कार्यात सर्वात महत्वाचे आहे, याची जाणीव सरकारला असून त्यामुळेच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशीही महत्वाची माहिती अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजदंडाचे होणार हस्तांतरण
या उद्घाटन कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग राजदंडाचे हस्तांतरण हा आहे. ही पुरातन परंपरा आहे. याला तामिळ भाषेत सेंगोल असे म्हणतात. ही परंपरा दक्षिण भारतातील, विशेषत: तामिळनाडूतील आहे. सेंगोल याचा अर्थ वैभवसंपन्न असा आहे. हा राजदंड ब्रिटिशांची राजवट भारतात आल्यानंतर त्यांनी हस्तगत केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही काळ तो जवाहरलाल नेहरुंकडे हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र आता तो प्रयागराज येथील वस्तूसंग्रहालयात आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटून गेली. पण याची विशेष माहिती भारतातील नागरिकांना नाही. पंतप्रधान मोदी यांनी या राजदंडाचा इतिहास माहीत करुन घेतला आहे. तो वस्तूसंग्रहालयात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे त्याला आता संसद भवनातील लोकसभागृहात सभाध्यक्षांच्या आसनाजवळ स्थान दिले जाणार आहे.
या विरोधी पक्षांचा बहिष्कार
काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनदा दल, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, एआयएमआयएम, केरळ काँग्रेस (मणी गट), विदुथलाई चिरुथाईगल कच्छी, राष्ट्रीय लोकदल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, क्रांतीकारी समाजवादी पक्ष आणि मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम या 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
विरोधकांच्या वेचक प्रतिक्रिया
या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.
– संजय सिंग, आम आदमी पक्ष
राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यांना या कार्यक्रमाला न बोलावून त्यांचा सरकारने मोठा अवमान केला आहे.
– डी. राजा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
ड नव्या संसदेच्या भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे. पंतप्रधान मोदींकडून ते होऊ नये. तसे होणे अत्यंत अयोग्य, अनुचित आहे.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते