जोधपूरमधील घटना : काँग्रेसला मोजावी लागली होती मोठी किंमत
वृत्तसंस्था / जोधपूर
सुमारे 27 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या एका निदर्शनाने जोधपूरचे राजकीय चित्रच बदलून ठेवले होते. याप्रकरणी 27 वर्षांनी पोलिसांनी अर्धवट तपासासह न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जोधपूर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंतच्या सर्वात प्रदीर्घ चौकशीचा विक्रम केला आहे. या निदर्शनप्रकरणाचे आरोपी 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे झाले आहेत, तर अनेक जण आता हयात नाहीत. पोलिसांकडून दाखल आरोपपत्रात एकूण 23 जणांना आरोपी करण्यात आले आहे.
29 सप्टेंबर 1993 रोजीचे प्रकरण असून त्या दिवशी हजारोंच्या जमावाने जोधपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती. या निदर्शनादरम्यान लोकांनी मोठे नुकसान घडवून आणले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांचे वाहन उलटवून त्यात तोडफोड करण्यात आली होती. याचबरोबर एका मोठय़ा प्रशासकीय अधिकाऱयाच्या हातात बांगडय़ा भरण्यात आल्या होत्या. याप्रकरणी 30 सप्टेंबर 1993 रोजी उदय मंदिर स्थानकात एफआयआर नोंदविण्यात आली होती. याची चौकशी 27 वर्षानंतरही संपुष्टात आलेली नाही. काही आरोपींना अद्याप पोलिसांना अटक करता आलेली नाही.
गणेशमूर्ती विसर्जनावरून वाद
जोधपूरमध्ये 1993 साली पहिल्यांदा जालौरी गेट चौकावर गणेश महोत्सव समितीकडून भगवान गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. याच्या विसर्जन मार्गावर वाद झाल्यावर पोलिसांनी स्वतःच मूर्ती ताब्यात घेत विसर्जन केले हेते. या पार्श्वभूमीवर जोधपूरच्या मुथाजी मंदिरातील प्रवचनादरम्यान स्वामी रामसुखदास महाराजांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर हजारोंचा जमाव त्यांच्यामागून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. लोकांच्या मागण्या ऐकून घेण्याची तयारी प्रशासनाने न दाखविल्याने शांततेने निदर्शने करणाऱया महिलांनी अधिकाऱयांना मारहाण तसेच कार्यालयात तोडफोड केली होती.
जोधपूरचे राजकीय चित्रच बदलले
घटनेवेळी राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. निदर्शनानंतर संतप्त संत समुदायाने हजारो लोकांना सत्तारुढ पक्षाला मतदान न करण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावली होती. त्यानंतर डिसेंबर 1993 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत याचा स्पष्ट प्रभाव दिसून आला. जोधपूरमधील तिन्ही मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता.