आयपीसीसीच्या अहवालाचा अत्यंत गंभीर इशारा देणारा निष्कर्ष- दक्षिण भारतात अतिवृष्टीचे संकट शक्य
वृत्तसंस्था / जिनिव्हा
आगामी 20 वर्षांमध्ये पृथ्वीचे तापमान निश्चितपणे 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. हा प्रकार हवामान बदलामुळे घडणार असल्याचा खुलासा इंटरगव्हर्नमेंट्ल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) नव्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात 195 देशांमधून जमविण्यात आलेल्या हवामान तसेच उष्णतेशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. पूर्वी 50 वर्षांमध्ये येणारी प्रचंड उष्णलाट आता दर 10 वर्षांनी येत आहे. पृथ्वी अधिक उष्ण होण्याची ही सुरुवात असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. भारतात यामुळे वणव्यांचे मोठे संकट उभे ठाकू शकते.
मागील 40 वर्षांमध्ये तापमान वेगाने वाढले आहे. प्रदूषणाला आळा न घातल्यास प्रचंड उष्णता, वाढते तापमान आणि अनियंत्रित हवामानाला तोंड द्यावे लागणार आहे. हवामान बदलाची समस्या भविष्यातील नसून आताचे संकट आहे. जगातील कानाकोपऱयावर या संकटाचा प्रभाव दिसून येतोय. भविष्यात तर ही स्थिती अधिकच भयावह ठरणार असल्याचे या अहवालाचे प्रमुख लेखक आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे वैज्ञानिक प्रेडरिके ओट्टो यांनी म्हटले आहे.
प्रदूषण अशाचप्रकारे वाढत राहिल्यास, हवामान बदल न रोखल्यास 2100 सालापर्यंत सरासरी तापमानात 4.4 अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. तापमानात इतकी भर पडल्यास आर्क्टिक, ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकातील ग्लेशियर आणि हिमखंड वेगाने वितळतील. पुढील 20 वर्षांमध्ये तापमानात सरासरी वृद्धी 1.5 अंश सेल्अिसची असणार आहे. तसेच या बदलांचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत दूर करता येणार नाही.
भारताशी संबंधित महत्त्वाचे निष्कर्ष
जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य आता हातातून निसटल्याचे आयपीसीसीच्या अहवालातून स्पष्ट होते. अशा स्थितीत भारताला मोठा वणवा, अधिक क्षमतेचे चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच भारतातील मैदानी भागांमध्ये उष्णतेची असहय़ लाट उद्भवण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील 10 वर्षांमध्ये जीवघेण्या उष्णलाटेच्या घटनांमध्ये वाढ होण्याची मोठी शक्यता असल्याने भारताला आतापासूनच त्याकरता तयारी करावी लागणार आहे.
दक्षिण भारतात अतिवृष्टीचे संकट
देशातील पावसाची सरासरी वाढण्याचा अनुमान आहे. पावसातील वृद्धी भारताच्या दक्षिण भागांमध्ये अधिक गंभीर असणार आहे. दक्षिण-पश्चिम किनाऱयावर सुमारे 20 टक्के अधिक पाऊस पडू शकतो. पृथ्वीचे तापमान 4 अंशांनी वाढल्यास भारतातील पावसाचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढण्याची भीती आहे. अशा स्थितीत अतिवृष्टी आणि पुरापासून वाचण्याचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. याचबरोबर 7,517 किलोमीटरच्या सागरी किनाऱयासोबत भारताला वाढत्या समुद्रपातळीला तोंड द्यावे लागणार आहे.
6 शहरांना मोठा धोका
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी 50 सेंटीमीटरने वाढल्यास बंदरे असलेल्या 6 भारतीय शहरांना मोठा फटका बसणार आहे. चेन्नई, कोची, कोलकाता, मुंबई, सूरत आणि विशाखापट्टणममधील कोटय़वधी लोकांना मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागू शकते. पूरसंकटामुळे मालमत्तेचे सुमारे 4 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची भीती आहे.