केएसआरटीसीची ट्वीटरद्वारे माहिती : बेंगळूर, मंगळूरसह इतर शहरांमधून बसेस सोडणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्थगित असलेली आंतरराज्य बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. 22 सप्टेंबरपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) ट्वीटरद्वारे दिली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील जनतेला अनुकूल होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक 4.0 मार्गसूचीनुसार आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले होते मात्र, सरकारी बसेसद्वारे पुरविण्यात येणारी प्रवासी वाहतूक सेवा सुरू केल्या नाहीत. आता प्रवाशांच्या सोयीखातर 22 सप्टेंबरपासून केएसआरटीसीकडून महाराष्ट्रात बससेवा सुरू केली जात आहे. बेंगळूर, मंगळूर, दावणगेरे व इतर प्रमुख शहरांमधून महाराष्ट्रात बसेस सोडण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी काही सुरक्षा मार्गसूचींचे पालन करावे लागणार आहे. सर्व प्रवाशांना मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. आगाऊ तिकीट बुकींगसाठी प्ttज्s://क्srtम्.ग्ह आणि बसस्थानकांवरील पॅन्चाईजी काऊंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तामिळनाडूसाठी बसेस सोडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तेलंगणा सरकारने बससेवा आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. मात्र, आंध्रप्रदेशमधील विजयवाडा, रायलसीमा, नेल्लोर, वंगोल, तिरुपती, मंत्रालयम, अनंतपूर आणि कर्नुल या शहरांसाठी कर्नाटकातून बससेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तर केरळमध्ये केवळ एर्नाकुलमसाठी बसेस सोडण्यात येत आहेत.