गेल्या चार दिवसांपासून केवळ मोजकाच वेळ पाणीपुरवठा
बेळगाव : गळती निवारणासाठी शहर व उपनगरातील विविध भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. मात्र अनगोळ परिसरातील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झाला नाही. 24 तास पाणी योजनेतील परिसरासह इंदिरानगर, रेल्वे लाईन शेजारील वसाहतींमध्ये शिवशक्तीनगर अशा विविध भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
एल अॅण्ड टी कंपनीच्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने बसत आहे. मागील आठवड्यात हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. सलग दोन दिवस पाणीपुरवठा झाला नसल्याने शहरवासियांची गैरसोय झाली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अनगोळ भागातील 24 तास पाणी योजनेतील परिसरासह विविध वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या भागात 24 तास पाणीपुरवठा केला जातो. पण सध्याच्या समस्येमुळे केवळ रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा होत आहे. परिणामी रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आठ दिवसापासून पाणी नसल्याने टँकरला 500 ते 600 रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. प्रति महिना पाणीपट्टी भरायची आणि पाणी मिळाले नाही तर टँकरला पैसे भरावे लागत आहेत. अशाप्रकारे पाण्यासाठी पैसे वाया जात आहेत. सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. पण एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. 24 तास पाणीपुरवठा योजनेतील रहिवाशांनाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह अनगोळ भागातील रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे.