57 हजार 17 अर्ज दाखल : बहुतांश लाभार्थी रेशनपासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या उमेश कत्ती यांच्या जिल्हय़ातच 24 हजारहून अधिक कुटुंबीय नवीन रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. लॉकडाऊन, कोरोना आणि निवडणुकांमुळे नवीन रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता दोन तीन महिन्यांपासून रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अद्याप बहुतांश लाभार्थी रेशनकार्डपासून वंचित आहेत.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दारिद्रय़ रेषेखालील जनतेला रेशनचा पुरवठा केला जातो. यासाठी रेशनकार्ड आवश्यक आहे. सुमारे 57 हजार 17 लाभार्थ्यांनी रेशनकार्डसाठी रितसर ऑनलाईन अर्ज केले. मात्र, अद्याप त्यांना रेशनकार्ड मिळाले नाही. त्यामुळे दरमहा मिळणाऱया रेशनपासून वंचित राहावे लागत आहे.
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनदेखील काहींनी खोटी माहिती पुरवून रेशनकार्डे मिळविली आहेत, अशांची रेशनकार्डे रद्द करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. अधिक मालमत्ता असणाऱयांनीदेखील बीपीएल रेशनकार्डे मिळविली आहेत, अशांवर कारवाई करून रेशनकार्डे बंद केली जात आहेत.
नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी 57 हजारहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी टप्प्याटप्प्याने कार्डचे वितरण केले जात आहे. मात्र, अद्यापही 24 हजारहून अधिक लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. अन्नभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड आवश्यक आहे. याबरोबरच मोफत वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी आयुष्मान भारत कार्डदेखील गरजेचे आहे. बीपीएल कार्डला आयुष्मान भारत कार्ड जोडले जाते. निवडणूक ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा (अडेस प्रूफ) म्हणूनदेखील रेशनकार्डचा वापर होतो.