कोर कमांडर स्तरीय बैठक होणार- गोगरा, हॉट स्प्रिंग्स अन् देपसांगचा मुद्दा चर्चेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत-चीन यांच्या सैन्याधिकाऱयांची 12 व्या फेरीतील बैठक 31 जुलै रोजी होणार आहे. चीनने यापूर्वी 26 जुलै रोजी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता, पण भारातने कारगिल विजय दिनामुळे बैठकीचा दिवस बदलण्याची मागणी केली होती.
गोगरा, हॉट स्प्रिंग आणि देपसांगमध्ये 900 किलोमीटर भागातील तणाव संपुष्टात आणण्यावर भारताचा भर असणार आहे. मागील वर्षाची स्थिती पुन्हा आणली जावी अशी भारताची इच्छा आहे. तर चीन याकरता तयार नाही. गोगरा आणि हॉट स्प्रिंगमधील सर्व मुद्दय़ांवर त्वरित तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे, कारण देपसांगवर सहमती होण्याकरता वेळ लागू शकतो.
डेमचोकमध्ये चिनी नागरिकांचे वास्तव्य
चिनी सैन्याने आता पूर्व लडाखमध्ये डेमचोकच्या चारदिंग नाला भागाच्या भारतीय क्षेत्रांमध्ये तंबू ठोकल्याचे समजते. तेथे कथितपणे चिनी नागरिक देखील राहत आहेत, अनेकदा बजावूनही ते तेथून जाण्यास तयार नसल्याचे समजते.
आतापर्यंत 11 बैठका
यापूर्वी झालेल्या 11 बैठकांमध्ये पूर्व लडाखमध्ये उत्तर आणि दक्षिण पॅगाँग सरोवर भागातील डिसएंगेजमेंटवरून सहमती झाली होती. या भागांमध्ये डिसएंगेजमेंटनंतर दोन्ही देशांचे सैन्य स्वतःच्या कायमस्वरुप चौक्यांवर पोहोचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गलवाननंतर तणाव
मागील वर्षी गलवान खोऱयात झालेल्या हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य परस्परांसमोर तैनात आहे. भारताने सैन्य, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलातील कमांडो या भागात तैनात केले आहेत. लढाऊ विमाने अनेक महिन्यांपासून सातत्याने उड्डाण करत आहेत. दीर्घकाळ तैनात पाहता भारताने रसद समवेत अन्य आवश्यक सामग्री पूर्वीच संबंधित क्षेत्रात पोहोचविली आहे.