120 परीक्षा केंद्रांवर नियोजन : 1 हजार 114 रीपिटर्स विद्यार्थी : यावर्षी जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा होणार
बेळगाव : बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली असून, विद्यार्थ्यांचे आता दहावी परीक्षेकडे लक्ष लागले आहे. 31 मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 31 हजार 968 फ्रेशर्स तर 1 हजार 114 रीपिटर्स विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा जवळ आल्यामुळे शिक्षण विभागासह विद्यार्थी पालकही तयारीला लागले आहेत. 29 मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या असून, 31 पासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. यंदा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 120 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बेळगाव शहरात 27 परीक्षा केंद्रांवर 8 हजार 614 तर ग्रामीण भागातील 19 परीक्षा केंद्रांवर 5 हजार 735 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या वर्षीचा निकाल चांगला लागण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळांना सूचना करण्यात आल्या होत्या. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुटल्यानंतर तसेच शाळा भरण्यापूर्वी शिकविण्या घेतल्या जात होत्या. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे परीक्षांच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आला होता. परंतु यावर्षी जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा होणार आहेत. दहावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून असल्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमधून विशेष तयारी करून घेतली जात आहे. शाळांमधूनही विद्यार्थ्यांना महत्त्वाचे घटक, त्यांची उजळणी या संदर्भात माहिती दिली जात आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाच्यावतीने सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देवून तेथील माहिती जमा केली जात आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर अपुऱ्या सोयी सुविधा आहेत. त्या ठिकाणी त्या पुरविण्यासाठी सूचना केल्या जात आहेत. उन्हाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची स्वच्छता याकडे लक्ष दिले जात आहे.