मुंबई \ ऑनलाईन टीम
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत काँग्रेवर हल्लाबोल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘गरीबी हटाव’च्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्र्य निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले.
या ट्विटसोबतच चंद्रकांत पाटील यांनी एक फोटोही शेअऱ केला आहे. ज्यात लिहिलं आहे, आणीबाणी- भारतीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काँग्रेसचे लांच्छनास्पद कारस्थान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली.