येत्या पंधरा दिवसात कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन : केव्हाही तपासणी करण्याचा इशारा
प्रतिनिधी / खानापूर
राज्य शासनाने 2017 साली सार्वजनिक सुरक्षितता व दक्षता कायदा अंमलात आणला आहे. त्यानुसार आता दिवसाकाठी किमान 50 जणांचा संपर्क येणाऱया बँका व्यवसाय केंद्रे, दुकाने व इतर सार्वजनिक संस्थांनी आता सीसी कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. अशी माहिती बैलहोंगलचे पोलीस अधीक्षक शिवानंद कट्टगी यांनी खानापूर येथील तालुका पंचायत सभागृहात आयोजिलेल्या शहरातील बँका, सोसायटय़ांचे प्रतिनिधी, हॉटेल बार तसेच इतर व्यावसायिकांच्या सभेत बोलताना दिली. कर्नाटक शासनाच्या सार्वजनिक सुरक्षितता व दक्षता कायद्याची माहिती देण्यासाठी पोलीस खात्याकडून बैठकीचे आयोजन केले होते.
प्रारंभी खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन सभा बोलाविण्यामागचा उद्देश विशद केला. उपअधीक्षक शिवानंद कट्टगी यांचे शहरातील व्यापारी तसेच नागरिकांच्यावतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस उपअधीक्षक शिवानंद कट्टगी पुढे म्हणाले, हल्लीच्या काळात चोरी, दरोडे यासारख्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस खात्याकडून बऱयाच उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र चोऱया दरोडे यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिसाइतकेच जनतेचीही जबाबदारी आहे. यामुळे कुठल्याही बँका, व्यवसाय केंद्रे असोत, त्या ठिकाणी सुरक्षितता आणि दक्षतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी ज्या-ज्या ठिकाणी ग्राहकांची संख्या पन्नासहून अधिक असते त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसविणे कायदय़ानेच बंधनकारक केले आहे. सीसी कॅमेऱयामुळे आज अनेक गुन्हय़ांचा तपास लागत आहे. यासाठी अद्याप ज्या ठिकाणी व्यावसायिकांनी सीसी कॅमेरे बसविले नाहीत, त्यांनी येत्या पंधरा दिवसात त्याची अंमलबजावणी करावी यानंतर केव्हाही याची पाहणी केली जाईल, जर सीसी कॅमेरे नसतील तर अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी 112 क्रमाकांच्या वाहनाविषयी सविस्तर माहिती दिली.
खानापूर पोलीस स्थानकाला एक 112 क्रमाकांचे वाहन देण्यात आले आहे. आता या पुढे कुठेही काही घडल्यास त्वरित 112 क्रमाकांशी फोन करावा, तातडीने त्या ठिकाणी सदर वाहन पोलिसांसह येऊन संबंधितांना सहकार्य करणार आहे. तसेच आता अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिकेसाठी देखील 112 नंबरशीच संपर्क साधावा, ही सेवा चोवीस तास सुरू राहणार असून 9 पोलीस कर्मचाऱयांची कायमस्वरुपी नेमणूक केली आहे. खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत सदर वाहन बारा ठिकाणी थांबणार आहे. पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुठेही अघटीत घटना घडली तर कमीतकमी वेळेत सदर वाहन त्या ठिकाणी पोहचले आणि त्यामधील पोलीस संबंधितांना मदत करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार प्रकाश देशपांडे यांनी खानापूर शहर परिसरात पोलिसांकडून मिळणाऱया सेवेबद्दल तसेच सहकार्याबद्दल पोलीस खात्याला धन्यवाद दिले. तसेच पोलीस उपअधीक्षकानी केलेल्या सूचनांची शहरातील प्रत्येक व्यावसायिकांनी अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली. सभेला गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ तसेच शहरातील बँका, सोसायटय़ांचे प्रतिनिधी, हॉटेल व बार मालक गोल्डस्मिथ, किराणा व्यापारी व इतर उपस्थित होते.