राज्यभरात 621 जणांची माघार : तब्बल 64 जण बिनविरोध विजयी,निवडणूक चिन्हांचेही वाटप,आजपासून प्रचाराचा धडाका
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 186 ग्रामपंचायतींच्या येत्या 10 ऑगस्ट रोजी होणाऱया निवडणुकीसाठी 5038 उमेदवार रिंगणात राहिले असून 64 जणांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहेत. काल बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 621 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. रिंगणात राहिलेल्यांना निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात आले असून निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी ही माहिती दिली.
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दि. 18 जुलैपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली होती. त्यानुसार सहा दिवसांच्या कालावधित म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 6256 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी झालेल्या छाननीत 14 अर्ज बाद ठरल्याने 5723 उमेदवार रिंगणात राहिले होते.
काल बुधवारी 621 जणांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सायंकाळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.
5038 उमेदवार आजमावणार नशीब
सर्वाधिक 995 उमेदवार बार्देश तालुक्यातून नशीब आजमावणार आहेत. त्यापाठोपाठ सालसेत तालुक्यातून 863, फोंडय़ातून 600 पेक्षा जास्त, तिसवाडीमधून 550 पेक्षा जास्त, पेडणेतून 350 पेक्षा जास्त व डिचोलीमधून 400 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहिले आहेत. निवडणुकीचे प्रचारकार्य आजपासून खऱया अर्थाने प्रारंभ होणार असून दि. 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
तालुकानिहाय उमेदवार
- पेडणे – 450 (4 बिनविरोध)
- डिचोली – 380 (9 बिनविरोध)
- सत्तरी – 259 (11 बिनविरोध)
- बार्देश 995 (13 बिनविरोध)
- तिसवाडी – 583 (4 बिनविरोध)
- फोंडा – 601 (1 बिनविरोध)
- धारबांदोडा – 123 (1 बिनविरोध)
- सांगे – 156 (2 बिनविरोध)
- सालसेत – 863 (11 बिनविरोध)
- मुरगाव – 219 (1 बिनविरोध)
- केपे – 240 (4 बिनविरोध)
- काणकोण – 169 (3 बिनविरोध)