मालदीवचे अध्यक्ष सोलिह भारत दौऱयावर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांच्यात मंगळवारी झालेल्या शिखर बैठकीनंतर दोन्ही देशांदरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱया झाल्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान क्षमतावृद्धी, सायबरसुरक्षा, गृहबांधणी, आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्य वाढविण्यावरून हे करार झाले आहेत.
मालदीवला 10 कोटी डॉलर्सची अतिरिक्त कर्जसुविधा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करता येऊ शकतील. दोन्ही देशांदरम्यान मैत्रिपूर्ण संबंधांमध्ये नवा उत्साह दिसून येत असून जवळीक वाढली आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांनंतरही आमच्यातील सहकार्य व्यापक भागीदारीचे रुप धारण करत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले आहेत.
हिंदी महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुन्हे, दहशतवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीचा गंभीर धोका आहे. शांततेसाठी भारत-मालदीव यांच्यातील घनिष्ठ संबंध महत्त्वपूर्ण आहेत. भारत-मालदीव भागीदारी दोन्ही देशांच्या नागरिकांच्या हिताकरता काम करत आहे, तसेच ही भागीदारी स्थैर्याचा स्रोत देखील ठरत आहे. मालदीवसमोर उद्भवलेल्या कुठल्याही संकटावर भारताने सर्वप्रथम धाव घेतली असल्याचे मोदी म्हणाले.
दहशतवादाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी दृढ प्रतिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत. मालदीव भारताचा खरा मित्र आहे आणि कायम राहणार असल्याचे सोलिह यांनी म्हटले आहे. सोलिह एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत चार दिवसीय भारत दौऱयानुसार सोमवारी दिल्लीत पोहोचले होते. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या प्रमुख सागरी शेजारी देशांपैकी एक आहे. मागील काही वर्षांमध्ये संरक्षण तसेच सुरक्षेच्या क्षेत्रासह समग्र द्विपक्षीय संबंधांमध्ये वृद्धी झाली आहे.