गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम आणि मेघालय या ईशान्य भारतातील राज्यांच्या सीमारेषेवरील हिंसाचारत सहा लोकांचा बळी पडला आहे. यात एका वनसंरक्षकाचाही समावेश आहे. हा हिंसाचार पश्चिम कार्बी अँगलाँग जिल्हय़ात मंगळवारी पहाटे घडला असे स्पष्ट करण्यात आले. या हिंसाचारात बळी पडलेल्यांपैकी 5 जण मेघालयचे नागरीक आहेत. तर एक आसामचा आहे, जो वनसंसरक्षक होता.
लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक ट्रक आसामच्या पोलिसांनी आडविल्यानंतर हिंसाचाराला प्रारंभ झाला. हा ट्रक मेघालयमधील लाकूड तस्करी करणाऱयांचा होता. यावेळी मेघालयचे नागरीक असणाऱया काही सशस्त्र लोकांनी ट्रक आडविणाऱया वनसंरक्षकावर हल्ला केला. आसाम पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात पाच हल्लेखोर ठार झाले. यावेळी मेघालयातून आलेल्या काही सशस्त्र व्यक्तींनी पुन्हा आसाम वनसंरक्षकांवर हल्ला चढविला. तथापि, तो परतवून लावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये मेघालयाच्या खासी जनजातीच्या तीन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
आता आसामच्या सीमारेषेवरील दोन जिल्हय़ांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. मेघालय सरकारनेही आपल्या बाजूकडून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. आसाम आणि मेघालय यांच्यात बऱयाच काळापासून सीमावाद आहे. त्यातून अशा हिंसाचाराच्या घटना पूर्वीही बऱयाचदा घडल्या आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.