वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याप्रकरणी भारत औपचारिक स्वरुपात पाकिस्तानची चौकशी करणार आहे. सीआरपीएफच्या ताफ्यावर जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सामील दहशतवाद्यांचा तपशील पाकिस्तानकडून मागण्यात येणार आहे. या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एक औपचारिक न्यायिक विनंती किंवा लेटर रोजेटरी (एलआर) तयार केला असून याद्वारे 7 दहशतवाद्यांविषयी तपशील मागविण्यात आला आहे. पाकिस्तानातील मौलाना मसूद अजहर, त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगर आणि इब्राहिम अतहर तसेच चुलत बंधू अम्मार अल्वी या दहशतवाद्यांविषयी ही मागणी करण्यात आली आहे.
हा हल्ला घडवून आणण्यासाठी भारतात आलेले तीन पाकिस्तानी दहशतवादी अहतरचा मुलगा उमर फारुक, कामरान (पुलवामा हल्ल्यानंतर दोघेही चकमकीत मारले गेले) आणि इस्माइल उर्फ सैफुल्लाची माहिती गृह मंत्रालयाकडे आहे.
तयारीची माहिती
अजहर, असगर, अतहर आणि अल्वीच्या ठिकाणासह त्यांच्या आणि अन्य दहशतवाद्यांमधील व्हॉट्सऍपवरील संभाषण, व्हॉईस नोट आणि व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल कॉल आणि छायाचित्रांमध्ये दिसून आलेल्या लोकांच्या माहितीसह अन्य तपशील प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमर फारुकच्या फोनमधून हस्तगत छायाचित्रे आणि चित्रफितींमध्ये पुलवामा हल्ल्याच्या विविध टप्प्यांमधील तयारीविषयी माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानातून अर्थरसद
पुलवामा हल्ला घडवून आणण्यासाठी फारुकला भारतात पाठविण्यात आले होते. फारुकच्या फोनमधून प्राप्त जीपीएस लोकशनच्या माहितीसह पाकिस्तानात मीजान बँक आणि एलाइड बँकेत त्याच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या रकमेचा तपशीलही मागविण्यात आला आहे. तपासादरम्यान एनआयएला यासंबंधी माहिती प्राप्त झाली होती.