राहुल-प्रियंका…सोनिया गांधी बॉस – अमरिंदर सिंगांना केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब काँग्रेसमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू सातत्याने परस्परांना लक्ष्य करत आहेत. अमरिंदर सिंग दिल्लीत पोहोचले असून पक्षश्रेष्ठींकडून स्थापन समितीसमोर बाजू मांडणार आहेत. अमरिंदर दिल्लीत पोहोचताच सिद्धू यांनी त्यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये सर्वकाही सुरळीत नाही. ही लढाई कुठल्याही पदावरून नाही. तसेच कुणाच्या विरोधातील ही लढाई नाही. ही लढाई विचारसरणीची आहे. पक्षाची शिस्त मी मोडलेली नाही, स्वतःचे म्हणणे पक्षाच्या व्यासपीठासमोर मांडले असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.
केवळ दोन परिवारांच्या हातात सूत्रे
पंजाबला केवळ दोन परिवार चालवित आहेत. लोक नेत्यांना निवडतात, अधिकाऱयांना नाही. यंत्रणेला अधिकाऱयांच्या भरवशावर सोडून देणे योग्य नसल्याचे सिद्धू म्हणाले. आमदारांच्या मुलांना शासकीय नोकरी देण्यात आल्याप्रकरणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. एखाद्या आमदाराच्या पुत्राला शासकीय नोकरी देणे जनतेच्या हिताचे आहे का असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.
पबमालकांना शासकीय नोकरी
गरजेच्या आधारावर कुणीच कमावता नसलेल्यागरीबाच्या घरातील सदस्याला नोकरी देण्यात यावी. ज्याच्याकडे पब, शेकडो एकर जमीन आहे, अशा व्यक्तीला अनुकंपेच्या आधारावर नोकरी देण्यात आली. माझी लढाई याच व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.
विचारसरणी अन् मतभेदांची लढाई
राहुल गांधी, प्रियंका वड्रा हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, सोनिया गांधी आमच्या बॉस आहेत. कुणीच शिस्तभंग केलेला नाही. प्रत्येक व्यक्ती पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त होऊ शकतो. ही विचारसरणी अन् मतभेदांची लढाई आहे. हा राजकारणाचाच हिस्सा आहे. मी व्यवस्थेतील कुप्रथा पाहत आलो आहे, हेच चित्र मला बदलायचे असल्याचे ते म्हणाले.