वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शासकीय निधीतून जवळ-जवळ 3500 घरांना नळजोडणी करून 24 तास पिण्याचे पाणी मिळणार असल्यामुळे गृहिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून या योजनेसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निधीतून 3500 घरांना पिण्याच्या पाण्याची नळजोडणी, 1 लाख लिटर व दीड लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या, 1 विहीर तसेच 43 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन घालणे आदी कामे या निधीतून होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महिला वर्गातून स्वागत
केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून 3500 घरांना नळ जोडणी व 24 तास पाणी मिळणार असल्यामुळे आता यापुढे दररोज पिण्यासाठी ताजे पाणी मिळणार आहे. यापूर्वी गावाला दोन विहिरीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत होते. गावच्या लोकसंख्येच्या दृष्टीने ग्रा. पं. ला दररोज पाणी सोडणे आवाक्याबाहेर असल्यामुळे आठ दिवसातून नळाला पाणी सोडावे लागत आहे. यामुळे नागरिकांना आठ दिवसापर्यंत पाण्याचा वापर जपून करत आठ दिवस शिळेच पाणी पीत आपली तहान भागवावी लागत आहे. परंतु या योजनेतून आता 24 तास नळांना पाणी मिळणार असल्यामुळे खास महिला वर्गातून या योजनेचे स्वागत करण्यात येत आहे.
भूमिपूजन कार्यक्रम
य् ाावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील व उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून खोदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला. य् ाावेळी ग्रा. पं. सदस्य, मराठी शाळा सुधारणा अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, विभागीय अधिकारी मेहबूब अली, कंत्राटदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक, स्वागत व सूत्रसंचालन ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.