चार वर्षाचे आगाऊ पेमेंट केले ः कंपनीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने नुकत्याच संपलेल्या 5जी स्पेक्ट्रम लिलावामध्ये विकत घेतलेल्या स्पेक्ट्रमकरीता दूरसंचार विभागाला (डिओटी) 8,312.4 कोटी रुपये दिले आहेत. कंपनीने ही माहिती बुधवारी दिली.
एअरटेलने ही रक्कम चार वर्षांच्या हप्त्यांमध्ये आगाऊ रक्कम म्हणून दिलेली आहे. एअरटेलने सांगितले की या आगाऊ पेमेंटसह कंपनीला भविष्यात 5जी उभारणीसाठी अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे.
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल आणि भारती एअरटेलने 5जी स्पेक्ट्रमसाठी 43,039.63 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आगामी काळात आमच्या 5जी योजनेच्या प्रयत्नांवर अधिकचा भर दिला जाणार आहे. यासोबतच एअरटेल राइट्स इश्यूमधून 15,740.5 कोटी रुपये उभे करू शकते.’
ते म्हणाले की, आदर्श स्पेक्ट्रम बँक, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि पुरेसा रोख प्रवाह यामुळे आम्ही जागतिक दर्जाचा 5जी अनुभव देशात आणण्यास उत्सुक आहोत. कंपनीकडे 3,848.88 कोटी रुपये आगाऊ आणि उर्वरित रक्कम 19 वार्षिक हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय होता.