शासनाची फसवणूक केल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
दापोली प्रतिनिधी
नगर पंचायतीमधील 3 नगरसेवकांच्या विरोधात यापूर्वी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना आणखी 9 नगरसेवकांविरोधात त्याच प्रकारची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून 12 नगरसेवकांना अपात्र केल्यास दापोलीकरांना पुन्हा निवडणुकीला समोर जावे लागणार, अशी शक्यता आहे.
गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 16 डिसेंबर रोजी 9 नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, या सर्वांची निवडणूक ज्ञापनामध्ये मिळकत न दाखवल्यामुळे चौकशी व्हावी व खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याबद्दल या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आता जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.