पुणे / प्रतिनिधी :
राजस्थानात पसरलेली तीव्र थंडीची लाट तसेच उत्तरेकडील अनेक राज्यात पसरलेल्या थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. दरम्यान उत्तरेत पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात थंडी पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे.
जम्मू काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. याबरोबरच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, सिक्कीम, मध्य प्रदेश, गुजरातेत थंडीची लहर असून, याभागातील तापमानही खालावले आहे. ही सर्व स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. दुसरीकडे राजस्थान राज्यात तीव्र थंडीची लाट पसरली असून, येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ही सर्व स्थिती मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे. या सर्व हवामानाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम आहे. थंडी प्रभावित बहुतांश राज्यात धुक्याचे साम्राज्य पसरले आहे.
राजस्थानात उणे तापमान
राजस्थानातील तीव्र थंडीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथील अनेक भागात पारा खाली घसरला आहे. मैदानी भागात पश्चिम राजस्थानातील चुरु येथे उणे 2.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. या भागात मंगळवारी थंडीच्या लाटेचा अंदाज असून, त्यानंतर थंडीत घट होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तरेतील थंडी घटणार
हिमालयात 18 तसेच 20 जानेवारीला पश्चिमी झंझावात एकामागोमाग धडकणार आहेत. याच्या प्रभावामुळे राजस्थानातील थंडीचा अलर्ट बुधवारनंतर, तर इतर राज्यातील किमान तापमान वाढण्याचा अंदाज आहे. 18 तारखेपर्यंत राजस्थानसह उत्तर प्रदेश, बिहारमध्ये थंडी राहील. त्यानंतर थंडीतून दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात थंडी कायम
उत्तरेतील थंडीच्या प्रभावामुळे राज्यातही गारठा कायम आहे. दोन दिवशी ही स्थिती राहणार आहे.