सर्वसामान्यांना दिलासा, आवक वाढली
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या भाजीपाल्यांचे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीला दिलासा मिळाला आहे. सर्वच भाज्यांची आवक वाढू लागल्याने दरात घसरण होत आहे. मागील आठवडय़ात 60 रुपये किलो दराने विकली जाणारी भाजी 40 रुपयांवर आली आहे. शेवग्याच्या शेंगा वगळता इतर भाजीपाल्यांचा दर काहीसा कमी झाला आहे. स्थानिक भाजीपाला बाजारात दाखल होत असल्याने दर कमी होतील, अशी आशा नागरिकांना आहे.
शनिवारच्या किरकोळ आठवडी बाजारात कोबी 10 रुपये एक, फ्लॉवर 20 रु. एक, बटाटा 30 रु. किलो, कांदे 25 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, ओली मिरची 60 रु. किलो, बिनिस 40 रु. किलो, काकडी 40 रु. किलो, ढबू 60 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, शेवग्याचा शेंगा 50 रुपयाला पेंडी, लालभाजी 10 रुपयाला दोन पेंढय़ा, मेथी 10 रुपयाला दोन पेंढय़ा, कांदापात 20 रुपयाला चार पेंढय़ा, पालक 10 रुपयाला एक, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी असा दर आहे.
मागील वर्षभरापासून पाऊस आणि इतर कारणांमुळे भाज्यांचे दर भरमसाठ वाढले होते. त्यामुळे भाजीपाल्यांचा दर कधी कमी होणार? या प्रतीक्षेत सर्वसामान्य होते. आता हळूहळू आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर कमी होवू लागले आहेत. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला खराब झाला होता. त्यामुळे दर वाढले होते. आता लागवड करण्यात आलेला भाजीपाला बाजारात दाखल होऊ लागला आहे. विशेषतः स्थानिक शिवारातील भाजीपाला येवू लागला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक वाढून दरात घसरण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्मयात भाजीपाला येत असल्याचे दिसत आहे.