राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे प्रतिपादन : काहेरचा पदवीदान समारंभ उत्साहात
बेळगाव : गुणवत्तेच्या आधारावर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नवीन जीवनाला प्रारंभ झाला आहे. महान भारत घडविण्यासाठी तरुणांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. हे शिक्षण काहेरमधून दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी यशस्वी होऊ लागले आहेत. वैद्यकीय आणि इतर क्षेत्रात विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम काहेरच्या माध्यमातून होऊ लागले आहे, असे गौरवोद्गार कर्नाटकचे राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांनी काढले. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आणि रिसर्च (काहेर) स्वायत्त विद्यापीठाचा 13 वा पदवीदान समारंभ सोमवारी जेएनएमसीच्या सभागृहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे होते.
डॉ. गेहलोत म्हणाले, श्रेष्ठ, स्वास्थ्य व सशक्त आणि उज्ज्वल भारत बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यापासून शिक्षण व्यवस्थेत अनेक मोठे बदल झाले आहेत. केएलई शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी देश-विदेशात आपले करियर सुरू केले आहे. शिवाय जनतेला सेवा देऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून न थांबता देशासाठीही योगदान द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. काहेर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. नितीन गंगणे यांनी परिचय करून देताना काहेर विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते फार्मसी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, नर्सिंग, होमिओपॅथीमध्ये पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी 7 विद्यार्थी पीएचडी, 9 पोस्टल डॉक्टरल, 23 सुवर्णपदकांसह आरोग्य विज्ञान विभागात 1451 विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 445 पदव्युत्तर, 976 पदवी, 2 पदव्युत्तर डिप्लोमा, 7 विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योती नागामोती यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.