महाराष्ट्रातील सरकारवर आणणार दबाव
प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून सीमाप्रश्नाबाबत लक्ष पुरविण्यासाठी सोमवार दि. 26 रोजी कोल्हापूर येथे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या चलो कोल्हापूर या नाऱ्याला शहरासह ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला जात आहे.
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामेळाव्याला परवानगी न देता जमावबंदीचे आदेश काढून मराठी भाषिकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता दाद मागायची तर महाराष्ट्राकडेच, या भावनेतून मध्यवर्ती म. ए. समितीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या धरणे आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने सीमावासीय सहभागी होणार आहेत.
कर्नाटकात या ना त्या कारणाने सीमावासियांचा आवाज दाबला जात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारला सीमावासियांची जाणीव करून देण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. केवळ पाठीशी आहोत, हे इतके सांगून उपयोग होणार नसून, सीमावासियांच्या व्यथा समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मराठी भाषिकांकडून होत आहे. महाराष्ट्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचविण्यासाठी कोल्हापूरमध्ये धरणे आंदोलन होणार आहे. यासाठी सीमाभागात मोठ्या प्रमाणात जागृती केली जात आहे.
कोल्हापूरकरांची मिळणार साथ
कोल्हापूरने नेहमीच सीमावासियांबाबत मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. बेळगावमध्ये दडपशाही करताच त्याचे पडसाद काही क्षणात कोल्हापुरात उमटतात. त्यामुळे या धरणे आंदोलनावेळीदेखील कोल्हापूरकरांची साथ मिळणार आहे. सर्व पक्षीयांना आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करत त्याचा आवाज महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
असे होणार धरणे आंदोलन
बेळगाव शहर, तालुका व खानापूरमधील मराठी भाषिक आपापल्या गावातून कोल्हापूर येथे पोहोचणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 8.30 वा. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवमूर्तीला वंदन करून कोल्हापूरला मार्गस्थ होतील. सकाळी 11 वा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. भगवे फेटे, वाहनांना भगवे ध्वज लावून धरणे आंदोलनाला जाण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन म. ए. समितीकडून करण्यात आले आहे.