विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
प्रतिनिधी/ पणजी
दैवी गुण घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तीने आपले संपूर्ण जीवनही ईश्वरी कार्यासाठीच समर्पित केले. त्यामुळेच अनेकांच्या जीवनात ते परिवर्तन करू शकले, अशा शब्दात सुमारे 35 वर्षे महाराष्ट्र प्रांतात वेगवेगळ्या स्तरांवर संघाचे कार्य केलेले तसेच आणीबाणीच्या काळात गोव्यातही प्रचारकार्य केलेले सुहास हिरेमठ यांनी स्व. जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या महान कार्याचा गौरव केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग प्रचारक जयंत सहस्रबुद्धे यांच्या निधनानिमित्त पणजीत आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित या सभेस अन्य मान्यवरांमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्यासह सुभाष वेलिंगकर, दत्ता नाईक, रत्नाकर लेले, सुमंत आमशेकर, राजेंद्र भोबे, सुहास गोडसे, शिरीष आमशेकर, यांचा समावेश होता.
कार्यकर्त्यांना दुर्दम्य उत्साह देण्याचे कसब जयंतराव यांच्याकडे होते. अत्यंत मधूरवर्णी असे हे व्यक्तीमत्व म्हणजे कार्यकर्ता कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण होते. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे हा त्यांचा विशेष स्वभाव होता. एखादवेळी एखाद्यास नकार द्यायचा झाल्यास सुद्धा त्यातून कटुता निर्माण होणार नाही, एखादा कार्यकर्ता दूरावला जाणार नाही अशी कार्यपद्धती वापरण्याची हातोटी त्यांना लाभली होती, अशा शब्दात विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ घेऊन जयंतराव शेवटच्या श्वासापर्यंत वावरले. त्यांचे अकाली जाणे फार दु:खद असले तरी आता त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे ते म्हणाले.
आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सगा, सहकाऱ्यास श्रद्धांजली वाहण्याची वेळ येणे यासारखे दु:ख नाही, अशा शब्दात दत्ता नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.
रत्नाकर लेले यांनी बोलताना, कार्यकर्त्याला गमवायचे नाही यासाठी त्यांची कार्यपद्धती वाखाणण्यासारखी होती, असे सांगितले.
दिगंबर कामत यांनी बोलताना, उच्चविद्याविभूषित असलेल्यांना अनेकदा अहंकाराचा वारा लागतो. जयंतराव हे त्याला अपवाद होते. अत्यंत मनमिळावू आणि नम्र वागणूक असे हे व्यक्तीमत्व होते, असे ते म्हणाले.
जयंतराव हे केवळ इतरांना तत्वज्ञान सांगणारे नव्हते. ते स्वत: तसे जगत होते, अशा शब्दात त्यांचीच एक शिष्या कु. शर्वरी कुलकर्णी यांनी आदरांजली वाहिली.
विशेष प्रार्थना व शांतीमंत्राने श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली.