20 रोजी करणार अहवाल सादर करणार : समाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी सादर केली होती याचिका
प्रतिनिधी /वाळपई
पिसुर्ले पंचायत क्षेत्रात पाण्याच्या समस्या असून खनिज खंदकातील पाण्याची वापर यासाठी व्हावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेऊन गोवा खंडपीठाने एक विशेष समिती नियुक्त केली असून ही समिती सोमवार दि. 20 जून रोजी या भागातील खनिज खंदकाची पाहणी करून या संदर्भात अहवाल उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करणार आहे. त्यानंतर या पाण्याचे संवर्धन, वापर व भविष्यात पाण्याचा साठा संदर्भात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पिसुर्ले पंचायत क्षेत्रात प्रचंड खनिज उत्खनन झाले. यामुळे पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात खाली गेली. यामुळे नैसर्गिक स्तोत्र कोरडे पडले. यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.
ज्यावेळी खनिज उत्खननाचे काम सुरू होते. त्यावेळी संबंधित खाण कंपन्यांनी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र 2012 सालापासून भागातील खनिज उत्खननाचे काम पूर्णपणे बंद केलेले आहे. तेव्हा या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.
गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन खनिज खंदकामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा आहे. या पाण्याच्या साठय़ावर विशेष प्रकल्प राबवून हा पाणीसाठा गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध केल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊ शकते. त्याचप्रमाणे पाण्याअभावी भागातील जमिनी ओसाड पडलेल्या आहेत. त्या लागवडीखाली येऊ शकतात. मात्र याबाबत वारवांर मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खाण कंपन्यांनी ही प्रक्रिया हाती घेणे गरजेचे होते. मात्र त्यांच्याकडूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करून याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या याचिकेची गंभीर दखल घेऊन गोवा खंडपीठाने एक विशेष समिती नियुक्त केलेली आहे. ही समिती सोमवार दिनांक 20 जून रोजी भागातील खनिज खंदकाच्या पाण्याची पाहणी करणार असून सदर पाणी कशा प्रकारे वापरता येणार या संदर्भात अहवाल न्यायालयाला सादर करणार आहेत.
दरम्यान या संदर्भात याचिकादार हनुमंत परब यांच्याशी संपर्क साधला असता, उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या संदर्भात याचिकेची दाखल करून घेतलेली आहे. या पाण्याचा कशाप्रकारे वापर करता येईल, यासंदर्भात कृती समिती अभ्यास करून यासंदर्भात अहवाल न्यायालयाला सादर करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शेती, बागायती गुरांसाठी पाण्याच वापर होत नाही ही दुर्दैवी बाब !
वास्तविक खंदकांमध्ये कोटय़वधी लिटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र यावर सरकारने योजना राबवून या पाण्याचा वापर लोकांसाठी पाणी व ओसाड पडलेल्या जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी केल्यास मोठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून पाण्याअभावी या भागातील गुरे मृत्युमुखी पडत आहेत. मात्र त्यांच्यासाठी या खंदकातील पाण्याचा वापर करायला मिळत नाही, ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे, असे हनुमंत परब म्हणाले.
खाणींच्या उत्खननामुळे पाण्याचे स्रोत !
पिसुर्ले परिसरात खनिज खाणींच्या उत्खननामुळे पाण्याचे स्रोत नष्ट झालेले आहेत. यामुळे शेती बागायतीला आवश्यक स्वरूपाचा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे पूर्वजांनी काबाडकष्ट करून निर्माण केलेली शेती-बागायती कुळागरे अनेक लागवडी ओसाड पडलेले आहेत. यामुळे न्यायालयाकडे माध्यमातून दाद मागण्यासाठी याचिका सादर केली होती, असे यावेळी हनुमंत परब यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.