गोंयकार संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी : अन्यथा 27 हजार झाडे कापावी लागणार, वनसंहार टाळावा
काणकोण : गोंयकार या बिगरसरकारी संघटनेने गुळे ते बाळ्ळीपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणाला कधीच विरोध केलेला नाही. पण हा रस्ता तयार करताना साधारणपणे 27 हजार इतकी झाडे कापावी लागणार नाही. ती झाडे न कापता आवश्यक त्या ठिकाणी बोगदा तयार करण्यात यावा. तसेच शक्य झाल्यास स्टिल्ट पद्धतीने रस्ता तयार करावा. याबाबतीत आपल्या संघटनेचे मत आजमावून घ्यावे एवढीच इच्छा आहे. मात्र आजपर्यंत केवळ विरोधक असा शिक्का मारून आमच्या संघटनेची बदनामी करण्याचे सत्र सरकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालविले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस यांनी होवरे-पाळोळे या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या मार्गावरील मालवाहू वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही याचा अभ्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला नाही. रस्त्याचे रुंदीकरण कधी होईल तेव्हा होईल, निदान करमल घाटावरील धोकादायक वळणे हटविण्याचे काम तरी त्वरित सुरू करा अशी मागणी फर्नाडिस यांनी केली. या पत्रकार परिषदेला विकास भगत आणि उमेश तुबकी उपस्थित होते. यासंबंधी माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, विद्यमान सभापती रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांना संघटनेने निवेदन सादर केलेले आहे, असे यावेळी फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीत प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. पण विधायक सूचना केल्यास देखील त्याचा उलटा अर्थ काढून विरोधकांची गळचेपी करण्याचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सध्या काणकोण तालुक्यात चालू आहेत. एक प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे, असा आरोप भगत यांनी केला. साधारणपणे 45 मीटर इतका रूंद रस्ता तयार करायचा असताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्यासंबंधीचा अधिकृत आराखडा नाही. करमल घाटात वनसंहार झाल्यास पर्यावरणावर परिणाम होईल. या ठिकाणच्या वन्यजीवांवर तसेच जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या भागात बोगदा तयार करणे शक्य असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेला असताना हा अहवाल जाहीर केला जात नाही, असा दावा भगत यांनी केला.
दिवसेंदिवस हवामानात होणारा बदल जाणवत आहे. त्यामुळे आणखी वनसंहार नको एवढीच प्रामाणिक मागणी असताना आजवर कोणत्याच प्रकारच्या प्रशासकीय चर्चेच्या वेळी आमच्या संघटनेला विश्वासात घेण्यात आलेले नाही. या रस्त्यासंबंधीचा संपूर्ण अहवाल अभ्यास करून आमच्या संघटनेने तयार केलेला आहे. तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काणकोणवासियांच्या वतीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे संघटना सरदेसाई यांचे अभिनंदन करते, असे फर्नांडिस यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता वेळोवळी यासंदर्भात पाठपुरावा करण्याकडे संघटना लक्ष देणार आहे. लवकरच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याचे अधिकारी या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी या ठिकाणी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. चापोली डोंगरावर नुकत्याच ज्या आगी लागण्याच्या घटना घडल्या त्यात सुदैवाने मनुष्यहानी झालेली नसली, तरी वन्यप्राण्यांची भरपूर ससेहोलपट झालेली आहे, असा दावा भगत यांनी केला.