केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा मुद्दा : दिल्ली-पंजाबमधील काँग्रेस नेत्यांचा विरोध : पक्षश्रेष्ठी घेणार अंतिम निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली आणि पंजाबमधील पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेत चर्चा केली आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला समर्थन द्यावे की नको या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. दिल्लीत ‘आप’सोबत कुठलीच आघाडी असू नये, तसेच दिल्लीतील अधिकाऱ्यांची बदली अणि नियुक्तीसंबंधी केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात ‘आप’ला पाठिंबा देऊ नये असे मत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मांडले आहे. परंतु याबाबतीत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा असे नेत्यांनी निश्चित केले आहे.
20 मे रोजी केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-बढतीवरून अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोध करत आहेत. या अध्यादेशाला संसदेत आणि विशेषकरून राज्यसभेत मंजुरी मिळू नये म्हणून केजरीवाल काँग्रेस समवेत सर्व भाजपविरोधी पक्षांकडून समर्थन मागत आहेत.
पक्षाध्यक्ष खर्गे आणि महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्राच्या या अध्यादेशाला विरोध दर्शवत केजरीवालांना समर्थन देण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. तर दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. पक्षातील वादानंतर खर्गे यांना दिल्ली आणि पंजाबमधील नेत्यांशी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेणार असल्याची भूमिका मांडावी लागली होती.
पक्षात दोन गट
केजरीवालांना समर्थन देण्यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. केंद्र सरकारने अध्यादेशासंबंधी पावसाळी अधिवेशनात विधेयक आणल्यास आमचे खासदार याला विरोध करतील असे काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मागील आठवड्यात म्हटले होते. वेणुगोपाल यांच्या या वक्तव्यानंतर 23 मे रोजी दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेतली होती. यात प्रताप सिंह बाजवा, अजय माकन, संदीप दीक्षित समवेत अन्य नेते सामील झाले होते. या दोन्ही राज्यांच्या नेत्यांनी अबकारी घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात गुन्हे नोंद झाल्याचा दाखला देत समर्थन देण्यास नकार दिला होता.
ममता, पवार, केसीआर यांची भेट
केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात केजरीवालांनी आतापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेत समर्थन मागितले आहे.
‘आप’चे 11 रोजी शक्तिप्रदर्शन
केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात आम आदमी पक्ष 11 जून रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात शक्तिप्रदर्शन करणार आहे. याकरता आयोजित सभेत विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची तयारी आहे. परंतु या सभेत काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे.