प्रतिनिधी/कोल्हापूर
वीज ग्राहकांचा कोणताही दोष नसताना, महावितरण कंपनीने औद्योगिक व इतर सर्वच वीज ग्राहकांवर इंधन समायोजीत आकाराच्या नावाखाली 20 टक्के इतकी प्रचंड दरवाढ केली आहे. ही वीजदरवाढ रद्द करावी, वीज पुरवठा अखंडित पुरवावा, रास्त भावात वीज द्यावी, औद्योगिक वसाहतीमधील वीज दुरूस्ती व देखभालीची कामे दि.31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून, 1 सप्टेंबर पासून अखंडित वीज पुरवठा करावा. वीज खंडित झालेल्या काळातील वीज बिल माफ करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औद्योगिक संघटनांनी शुक्रवारी दिला. वरील निवेदन महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना देण्यात आले.तत्पूवीं औद्योगिक संघटनांच्या उद्योजकांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन,शिरोली मॅन्यू.असोसिएशन,गोकूळशिरगांव मॅन्यू.असोसिएशन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री, मॅन्यू.असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले, कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, इन्स्टीटयूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, कोल्हापूर उद्यम को.ऑप.सोसायटी, वीजग्राहक संघटना,इचलकरंजी यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.उद्योजकांनी महावितरण कार्यालयाच्या दारात प्रचंड घोषणा देवून परिसर दणाणून सोडून, रद्द करा.. रद्द करा… वीज दरवाढ रद्द करा.. अश्या घोषणा देण्यात आल्या.
या चर्चेत हर्षद दलाल, दिनेश बुधले, कमलाकांत कुलकर्णी, प्रताप होगाडे, मोहन पंडितराव, दिपक पाटील, सचिन शिरगावकर, संजय पेंडसे, संजय शेटे, श्रीकांत दुधाणे यांनी वीज दरवाढीबाबत मुद्दे मांडून वीजदरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यामध्ये आपल्यापेक्षा कमी दरात वीज मिळते, त्यामुळ येथील उद्योजक त्यांच्या स्पर्धेमध्ये उतरू शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग सुलभता धोरणानुसार उद्योग वाढ होत नाही. चुकीच्या पध्दतीने ग्राहकांना वीज जोडणी दिल्याने वीज मिटर्स खराब होवून उद्योजकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. महावितरण कंपनीतर्फे दोन कोरोना वर्षांतील नुकसान व अन्य अपेक्षित दर फरक वा खर्चवाढ यासाठी कंपनीकडून किमान 20000 कोटी रु वा अधिक दरवाढीची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर एप्रिल 2023 पासून पुन्हा प्रचंड दरवाढीचा बोजा पडणार आहे.
यावेळी सर्व दिपक पाटील, मोहन पंडितराव, संजय पेंडसे, संजय शेटे, श्रीकांत दुधाणे, सचिन शिरगावकर,विनय खोबरे, राहूल पाटील,सचिन पाटील, राजू पाटील,शामसुंदर तोतला, शिवाजी पोवार, विश्वजीत सावंत, हिंदूराव कामते, दिपक चोरगे, संजय जोशी, मोहन कुशिरे, भरत जाधव, धनंजय नलवडे,विजय कामते, अतुल पाटील, सुरजितसिंग पवार, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनिल घडाम, प्रदीप व्हरांबळे, शंतनु गायकवाड,जितेंद्र बामणे, बाळकृष्ण सावंत,अभिजित नाईक आणि इतर उद्योजक आणि मोठया संख्येने उपस्थित होते.
वीज दर कमी करणे आमच्या हातात नाही-अधिक्षक अभियंता.अंकुर कावळे वीजदर कमी करणे आमच्या हातात नाही, परंतु आपल्या तीव्र भावना महावितरणच्या मुख्य कार्यालया कळवू, याबाबत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचेसोबत आंम्ही प्रत्येक एमआयडीसीचा वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले.
खाजगी कंपन्यांचा वीज ग्राहकावर बोजा
अदानी पॉवर, रतन इंडिया व तत्सम खासगी वीज पुरवठा करणा-या कंपन्या नफ्यात आहेत तरीही या खासगी वीज कंपन्याच्या देण्यापोटी महावितरण कंपनी प्रामाणिक वीज ग्राहकांवर हा दरवाढीचा बोजा लादण्यात आला आहे, 2.85 कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नांवाखाली 20 टक्के प्रचंड दरवाढीचा बोजा जुलै 2022 पासून 5 महिन्यांसाठी लादण्यात आलेला आहे. ही रक्कम दरमहा 1307 कोटी रुपये म्हणजे सरासरी 1.30 रू प्रति युनिट याप्रमाणे सर्व ग्राहकांवर लादण्यात आलेली आहे. ही वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करावी अशी मागणी सर्व उद्योजक सभासद वीज ग्राहकांच्यावतीने करण्यात आली.