ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी रद्द करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाकरे सरकारने 12 नोव्हेंबर 2020 ला 12 जणांची यादी राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कोश्यारी यांच्याकडे दिली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांची नावं होती. शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांची नावे होती. मात्र, कोश्यारी यांनी यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मधल्या काळात यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची लॉटरी लागली.
अधिक वाचा : भारताचा जगात डंका; ब्रिटनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था 5 व्या क्रमांकावर
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याची माहिती आहे.