आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत त्यांच्या निवासास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार
मुंबई :
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यावधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमच्या लाडक्या आजी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती देताना आम्हाला अतिशय दु:ख होत असल्याचे सुलोचना दीदी यांच्या नातीने म्हटले आहे. दरम्यान आता सुलोचना दीदी यांना मनोरंजन विश्वासह राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
सुलोचना दीदी यांचे अंतिम दर्शन आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांच्या 11, प्रभा मंदिर सीएचएस, प्रभा नगर, पी.बाळू मार्ग नगर, प्रभादेवी. मुंबई या निवासस्थानी घेता येणार आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावमध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावी झाला. त्यांनी 1943 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
सुलोचना दीदींची प्रतिमा आजही लाखो सिनेरसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या‘, ‘मीठ भाकर‘, ‘धाकटी जाऊ‘ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला.
‘सांगत्ये ऐका‘, ‘मोलकरीण‘, ‘मराठा तितुका मेळवावा‘, ‘साधी माणसं‘, ‘एकटी‘ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
दीदींचे हे चित्रपट गाजले
त्यांचा मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती‘ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो‘ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.
त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई‘ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री‘, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्काराने गौरवण्यात आले.
सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे दुख? आहे, अशी शोक संवेदना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचना दीदी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. मराठी व हिंदी अशा 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांना अभिनयाची भुरळ घालण्राया सुलोचना दिदिनी या क्षेत्रात स्वत: च्या मृदू स्वभावातून आदर्श निर्माण केला.
चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई‘ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करण्राया वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
सुलोचना दीदी अभिनयाचं विद्यापीठ : विरोधी पक्षनेते अजित पवार
रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे. सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका चरित्र अभिनयाचा आदर्श आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा‘ चित्रपटातल्या अभिनयानं त्यांनी जिजाऊँ माँसाहेबांचं जिवंत दर्शन घडवलं, त्यांची ती भूमिका केवळ अविस्मरणीय आहे. अमिताभ, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शशीकपूर या अभिनेत्यांच्या यशस्वी कारकिर्दीत, त्यांच्या ‘आई‘ची भूमिका साकारण्राया सुलोचना दीदींचं मोलाचं योगदान असेही पवार यांनी म्हटले आहे. त्यांचं निधन हा आपल्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.