कोमुनिदादच्या इतर महाजनांनी केला पर्दाफाश : 11 जणांविरोधात ‘एसआयटी’कडे तक्रार
प्रतिनिधी / डिचोली
अडवलपाल कोमुनिदाद समितीच्या पाच पदाधिकाऱयांनी कोमुनिदादच्या मालकीची सर्व्हे क्र. 25/0 मधील 65 हजार 700 चौ. मी. जमीन थेट आपल्या कुटुंबियांच्या नावावर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत अडवलपाल कोमुनिदादच्या इतर महाजनांनी श्री शांतादुर्गा मंदिरात पत्रकार परिषदेत या घोटाळय़ाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी ‘एसआयटी’ कडे संबंधित 11 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘कुंपणनेच शेत खाल्ले’ असा हा प्रकार असून याबाबत स्थनिकांत संताप व्यक्त होत आहे. 2013 ते 2016 कोमुनिदाद समितीवर अध्यक्षपदी सागर रघुनाथ गावकर, मुखत्यार गोविंद शिवराम गावकर, उपमुखत्यार दिलीप हरिश्चंद्र गावकर, खजिनदार अर्जुन यशवंत गावकर, माजी मुखत्यार श्रीकांत जयराम गावकर हे आहेत. तर अडवलपाल कोमुनिदादची जमीन हिराबाई यशवंत गावकर, अर्जुन यशवंत गावकर, अलिशा अर्जुन गावकर, दिलीप हरिश्चंद्र गावकर, दीप्ती दिलीप गावकर, श्रीकांत जयराम गावकर, श्वेता जयराम गावकर, रघुनाथ फटी गावकर, साग रघुनाथ गावकर, शिवराम गोविंद गावकर, गोविंद शिवराम गावकर यांच्या नावावर बेकायदेशीररीत्या करण्यात आली आहे. या 11 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती कोमुनिदादचे माजी अध्यक्ष नेताजी दत्तू गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्यामसुंदर दशरथ गावकर, पंढरी गावकर, संदेश गावकर व इतर महाजनांची उपस्थिती होती.
जमिनीचे तुकडे करून कुटुंबियांच्या नावावर केले!
अडवलपाल गावातील या 25/0 सर्व्हेमधील 65 हजार 700 चौरस मीटर जमिनीच्या भागाला ‘घोली’ या नावाने ओळखले जाते. गेल्या 2013 ते 2022 पर्यंत विद्यमान समितीतील पदाधिकारीच विविध पदांवर आहेत. 2013 ते 2016 या वर्षांमध्ये या समितीच्या पदाधिकाऱयांनी या जमीन घोटाळय़ाला सुरुवात केली होती. आपल्याच कुटुंब संदस्यांच्या नावावर या जमिनीचे तुकडे करून नावावर केली आहे. त्यासाठी संबधितांनी न्यायालयात बनावट कागदपत्रे तसेच बनावट प्रतिज्ञापत्रे लावून आपली नावे चढवली आहेत. कुळांचा विषय तसेच म्युटेशन प्रक्रिया सुरू असतानाच हा विषय आमच्या लक्षात आला. त्याची नंतर चौकशी केली. माहिती हक्क कायद्याखाली संबंधित कागदपत्रे मिळवली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला, अशी माहिती नेताजी गावकर यांनी दिली.
घोटाळेबाजांकडून बैठक घेण्यास टाळाटाळ!
हा विषय गावात सर्वांच्या लक्षात आल्यानंतर गेल्या 31 ऑक्टो. रोजी समितीला जाब विचारून रितसर पत्रही लिहिले होते. परंतु समितीने यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. तसेच या घोटाळय़ावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली होती. तीही घेतली गेली नाही. तर समिती या प्रकारातून बचावासाठी पळवाटा शोधत आहे. समिती कोणतीही दाद देत नसल्याने गावात अखेर दवंडी पिटवण्यात आली व एक गाव बैठक घेण्यात आली. संपूर्ण प्रकार गावकऱयांच्या नजरेस आणून दिला. या चर्चेनंतर घोटाळेबाज समितीतील पदाधिकाऱयांवर संबंधित अधिकारी, खात्यांकडे तसेच एसआयटीकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे नेताजी गावकर यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा!
या जागेचा किमान दर जरी लावल्यास सुमारे रु. साडेसहा कोटी इतकी किंमत होणार. या जमीन घोटाळय़ाप्रकरणी सरकार दरबारी तक्रार करण्यात आली आहे. यावर गंभीरपणे लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी मार्फत या प्रकरणावर योग्य दिशेने चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी यावेळी उपस्थित महाजनांनी केली आहे.