इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानात बेकायदेशीर मार्गाने आलेल्या अफगाणिस्तानच्या शरणार्थींना परत पाठविणार नाही, अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. ज्या शरणार्थींच्या जवळ आवश्यक ती कागपदत्रे नसतील त्यांना दंड केला जाईल. त्यांना काळय़ा यादीत टाकले जाईल. मात्र त्यांना परत धाडले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्ताच्या सीमेवर सातत्याने चकमकी होत आहेत. त्यात अनेक पाकिस्तानी नागरीक आणि सैनिकही ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरणार्थींना परत न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जे अफगाण नागरीक पाकिस्तानात निर्धारित कालावधीनंतरही रहात आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पाकिस्तानने ऑक्टोबर महिन्यात दिला होता. त्यांना एकतर कारागृहात डांबण्यात येईल किंवा त्यांच्या देशात त्यांना सक्तीने पाठविण्यात येईल, असेही पाकिस्ताने म्हटले होते. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची सत्ता आल्यानंतर लक्षावधी अफगाण नागरीकांनी पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. या नागरीकांमध्ये माजी अफगाण सैनिक आणि सैन्याधिकारी यांचाही समावेश आहे. त्यांना पाकिस्तानाने आपल्या देशात काम करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी, दोन्ही देशांच्या सेनांमध्ये वारंवार चकमकी घडत आहेत.